Jayant Patil On NCP Merger: गेल्या दिवसांपासून राजकीय वर्तुळात गाजत असलेल्या 'दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणा'च्या चर्चेवर अखेर शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी पडदा टाकला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर या प्रक्रियेला वेग येईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, पाटील यांच्या स्पष्टोक्तीमुळे आता विलीनीकरणाचा विषय तूर्तास निकालात निघाल्याचे चित्र आहे.
विलीनीकरणाची चर्चा थांबली; काय आहे मुख्य कारण?
जयंत पाटील यांनी अत्यंत महत्त्वाचे विधान करत या प्रकरणातील सद्यस्थिती स्पष्ट केली. ते म्हणाले, 'विलीनीकरणाची ही सर्व प्रक्रिया ज्यांच्या पुढाकाराने आणि ज्यांच्याशी सुरू होती, ते नेते (अजित पवार) आता आपल्यात नाहीत. त्यामुळे या चर्चेला आता अर्थ उरलेला नाही." दोन्ही गट एकत्र यावेत, ही इच्छा खुद्द अजित पवार यांचीच होती आणि त्यांनीच त्या दिशेने पावले उचलली होती, असा पुनरुच्चार पाटील यांनी केला. सध्याच्या परिस्थितीत दोन्ही पक्षांचे एकत्र येणे शक्य नाही, असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगून या प्रकरणाला पूर्णविराम दिला आहे.
12 फेब्रुवारीचा 'तो' प्लॅन आणि दावा
अजित पवार हयात असताना 12 फेब्रुवारी रोजी विलीनीकरणाची अधिकृत घोषणा होणार होती, असा दावा शरद पवार गटाकडून सातत्याने केला जात होता. विलीनीकरणानंतर पक्षाची संपूर्ण धुरा अजितदादांकडे सोपवण्याबाबतही ज्येष्ठ नेते सकारात्मक होते. मात्र, अजित पवार गटातील नेत्यांनी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी यावर आतापर्यंत मौन बाळगणे पसंत केले आहे.
हेही वाचा - Rohit Pawar: 'अजितदादांसारखचं एकनाथ शिंदेंचं विमान पाडणार होते, पण...'; रोहित पवारांचा स्फोटक दावा
अजित पवार गटाची भूमिका अद्याप अस्पष्ट
विलीनीकरणाच्या मुद्द्यावर शरद पवार गटातून वेळोवेळी विधाने येत असली तरी, अजित पवार गटाकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. समोरून प्रतिसाद नसल्याने आणि मुख्य सूत्रधार (अजितदादा) नसल्याने हा विषय आता पूर्णपणे मागे पडल्याचे जयंत पाटील यांच्या विधानावरून स्पष्ट होत आहे.