Thursday, May 22, 2025 06:57:42 PM

कॅन्सरच्या रुग्णांना आता मुंबईला जावं लागणार नाही; संभाजीनगरमध्ये कॅन्सर हॉस्पिटलचं विस्तारीकरण

संभाजीनगरच्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये ट्रू बीम यंत्रणेचा शुभारंभ; मराठवाड्याला आरोग्यसेवेचा दिलासा.

कॅन्सरच्या रुग्णांना आता मुंबईला जावं लागणार नाही संभाजीनगरमध्ये कॅन्सर हॉस्पिटलचं विस्तारीकरण


संभाजीनगर: संभाजीनगरमधील रुग्णांना कॅन्सरच्या उपचारासाठी आता मुंबई गाठण्याची गरज भासणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संभाजीनगर येथील कॅन्सर हॉस्पिटलच्या विस्तारीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. ट्रू बीम (True Beam) या अत्याधुनिक यंत्रणेच्या स्थापनेमुळे मराठवाड्याच्या आरोग्य सेवेला मोठा दिलासा मिळाला आहे.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आज सरकारी व्यवस्थेमध्ये पहिल्यांदाच संभाजीनगरमध्ये ट्रू बीम सारखी प्रगत यंत्रणा आली आहे. कॅन्सर झपाट्याने वाढत आहे आणि त्यासाठी आपल्या बदलत्या जीवनशैलीदेखील जबाबदार आहेत. या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी आम्ही आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे.

यापूर्वी संभाजीनगर आणि मराठवाडा विभागातील रुग्णांना कॅन्सरच्या उपचारासाठी मुंबईच्या टाटा रुग्णालयात जावे लागत होते. मात्र आता स्थानिक पातळीवरच प्रगत उपचार उपलब्ध होणार असल्याने रुग्णांचा वेळ आणि आर्थिक खर्च वाचणार आहे. या उपक्रमामुळे संपूर्ण मराठवाड्याला एक नवे आरोग्याचे वरदान लाभणार आहे.

हेही वाचा:पहलगाम हल्ल्यातील मृतांना शहीद दर्जा द्या; विनायक राऊत यांची मागणी

फडणवीस यांनी सांगितले की, 2016 साली आम्ही संभाजीनगरच्या कॅन्सर हॉस्पिटलला स्टेट कॅन्सर इन्स्टिट्यूटचा दर्जा दिला. त्यामुळे केंद्र सरकारकडून अतिरिक्त मदत मिळू शकते. तसेच पेट स्कॅनसाठीही परवानगी दिली आहे, ज्यामुळे कॅन्सरच्या निदान व उपचारामध्ये मोठी सुधारणा होईल.

मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की, गेल्या दोन वर्षांत आम्ही राज्यात 10 नवीन मेडिकल कॉलेजेस सुरू केली आहेत. यासाठी पाच हजार कोटी रुपयांचे कर्ज उभे केले आहे. प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र सिव्हिल हॉस्पिटल उभारण्याचेही आमचे लक्ष्य आहे. त्यामुळे मुख्य रुग्णालयांवरील भार कमी होईल आणि प्रत्येक भागात आरोग्यसेवा मजबूत होईल.

यावेळी फडणवीसांनी पंतप्रधान जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा उल्लेख केला. "या योजनांमुळे आतापर्यंत 12 कोटी जनतेला आरोग्य विम्याचा लाभ मिळाला आहे,असे ते म्हणाले.

सरकारी यंत्रणेतील गरिबांसाठी आणि खासगी क्षेत्रातील श्रीमंतांसाठी असलेली दरी कमी करून सर्वसामान्य जनतेला दर्जेदार आणि परवडणारी आरोग्यसेवा मिळवून देण्याचे आपले ध्येय असल्याचे फडणवीसांनी ठामपणे सांगितले.

संभाजीनगरमध्ये उभारण्यात आलेल्या या नवीन सुविधेमुळे संपूर्ण मराठवाड्याच्या आरोग्य सेवेत क्रांतिकारी बदल घडेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
 


सम्बन्धित सामग्री