उत्तरेकडे कडाक्याची थंडी पडली असून राज्यातील अनेक जिल्ह्यातील पारा 10 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. उत्तर भारतातून थंड हवेचे प्रवाह वाढल्याने राज्यात थंडी वाढत आहे. महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र, खानदेश आणि विदर्भ या ठिकाणी थंडीचा कडाका वाढला आहे. याचपार्श्वभूमिवर राज्यात कोकण किनारपट्टीसह मुंबई, ठाणे, रायगड परिसरात दमट हवामानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यादरम्यान मुंबईसह ठाणे, नवी मुंबईत, पालघर आणि रायगड जिल्ह्यांत कमाल तापमान सुमारे 31 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज असून किमान तापमान 18 अंशांच्या आसपास राहील. तसेच कोकणात पावसाची शक्यता नसून हवामान कोरडं राहील. पश्चिम महाराष्ट्रात पुण्यात कमाल तापमान सुमारे 32 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.
हेही वाचा- Mumbai Mega Block: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! तब्बल 120 लोकल फेऱ्या रद्द... घराबाहेर पडण्याआधी तिन्ही रेल्वेमार्गांवरील वेळापत्रक पाहा
कोल्हापूर, सांगली, सातारा आणि घाटमाथ्यावर पहाटे आणि संध्याकाळच्या सुमारास गार वारे वाहण्याची शक्यता असली तरी दुपारी मात्र कडक उन्हाचा सामना करावा लागणार आहे. विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात राज्यातील नीचांकी 8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून मराठवाड्यात थंड वातावरण राहील. छत्रपती संभाजीनगर येथे कमाल तापमान 32 अंश, तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. तर गोंदिया जिल्ह्यात किमान तापमान 8 अंशांपर्यंत घसरलं आहे. नागपूरमध्ये कमाल तापमान सुमारे 31 अंश आणि किमान तापमान 11 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.
हेही वाचा- BJP Raj K Purohit Passes Away : भाजपचे माजी अध्यक्ष राज पुरोहित यांचे निधन
त्याचसोबत जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड आणि झारखंडमध्ये हलक्या हिमवृष्टीसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच पंजाबमध्ये हरियाणा आणि चंदीगडमध्ये 18, 19 आणि 22 जानेवारी रोजी पावसाचा अंदाज वर्तावण्यात आला आहे. दक्षिण भारतात तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्टी भागात देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे.