एकीकडे राज्यभर उन्हाचा कडाका सुरु असताना नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. असं असताना राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. यावेळी यवतमाळ, वाशिम, नागपूर, वर्धा, बुलढाणा, अमरावती, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोदिंया या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. तर विदर्भ, मराठवाड्यात, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात ‘हिट वेव्ह’ चा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
आज कोकणासह मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई या ठिकाणी कमाल तापमान 34-37 अंशांवर असून हवामान कोरडे असणार आहे. तर उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, जळगावसह नाशिकमध्ये कमाल तापमान 40-43 अंश सेल्सिअसवर राहणार असून हलक्या पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात मात्र छत्रपती संभाजीनगरसह धाराशिव, जालना, नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, बीड या ठिकाणी उन्हाचे चटके जाणवणार आहेत.
विदर्भावर यावेळी उष्णतेसह वादळी वाऱ्याचं संकट घोंघावत आहे.
हेही वाचा- Baba Vanga: बाबा वेंगाची मोठी भविष्यवाणी! मे महिन्यात 'या' 5 राशी होणार मालामाल; पैसा, करिअर आणि प्रेमाचा वर्षाव, तुमची रास यात आहे का?
विदर्भात विजांसह ताशी 40-60 किमी वेगाने वारे वाहतील, तसेच अकोला, अमरावतीत तापमान 46.6 अंशांच्या पार असून अमरावतीत उष्माघाताचा पहिला बळी गेला आहे. अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात एका 70 ते 75 वर्षीय अज्ञात वृद्धाचा मृतदेह आढळला. कडक उन्हामुळे आणि वाढत्या तापमानामुळे या वृद्धाचा मृत्यू उष्माघाताने झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रुग्णालयाच्या मागील बाजूस असलेल्या एका बांधकामाच्या ठिकाणी हा मृतदेह आढळून आला. शहर कोतवाली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.