Friday, May 16, 2025 02:25:33 PM

अन्नपाण्यासाठी वन्यप्राण्यांची मानवी वस्त्यांकडे धाव

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाचोड परिसरातील अत्यल्प पाऊस झाल्यामुळे सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा फटका मानवी जीवनासह वन्य प्राण्यांना देखील बसत आहे.

 अन्नपाण्यासाठी वन्यप्राण्यांची मानवी वस्त्यांकडे धाव

विजय चिडे, प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील पाचोड परिसरातील अत्यल्प पाऊस झाल्यामुळे सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा फटका मानवी जीवनासह वन्य प्राण्यांना देखील बसत आहे. चारा व पाणी टंचाईचा प्रश्न आतापासूनच भेडसावू लागला आहे. परिसरातील गायराण जंगलात असणारे वन्यजीव अन्न पाण्याच्या शोधात वणवण भटकत आहेत. जंगलात अन्न पाण्याची व्यवस्था होत नसल्यामुळे या प्राण्यांनी नागरी वस्तीकडे धाव घेण्यास सुरुवात केली आहे. या वन्यप्राण्यांना रोखण्यासाठी वन विभागासह वन्यजीव विभागाकडून गायराण जंगलात त्यांच्या खाण्याची व पाणवठ्यांची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी वन्यप्राणी मित्रांकडून होत आहे. 

सध्या पाचोड, केकत जळगाव, मुरमा, कोळीबोडखा, लिंबगाव, थेरगाव, वडजी या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गायरान जंगल आहेत. या ठिकाणी नीलगाय, रान डुक्कर, ससे, हरिण, माकड यासह अनेक जातीचे प्राणी वास्तव्यास आहे. या प्राण्यांसाठी हा परिसर सुरक्षित असल्यामुळे या ठिकाणी वन्यप्राणी मुक्तपणे संचार करताना दिसतात. या ठिकाणी प्राण्यांसाठी पाणवठे उभारण्यात यावे अशी मागणी होत आहेत. सध्या वन्यप्राणी पाणी व खाद्य मिळवण्यासाठी मानवी वस्त्यांकडे धाव घेत आहेत. त्यामुळे मानव व वन्यप्राण्याचा संघर्ष होत आहे. गावात वन्यप्राणी घुसत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा :जय भद्राच्या जयघोषाने खुलताबादनगरी दुमदुमली

पैठण तालुक्यातील खेर्डा, दावरवाडी, ब्रह्मगव्हण या तलावात मागील काळात वन्यप्राण्यांसाठी मुबलक पाणी उपलब्ध असायचे. परंतु यावर्षी पाऊस अत्यल्प प्रमाण पडल्यामुळे या धरणात पाणीसाठा जमा झाला नाही. त्यामुळे दिवसेंदिवस हे तलाव कोरडे पडत आहे. सध्या या तलाव मृत साठा शिल्लक आहे. त्यामुळे घोटभर पाण्यासाठी वन्यप्राणी सैरावैरा धावत आहेत. या रस्त्याने येणारे जाणारे प्रवासी आपले वाहन थांबवून या माकडांना आपल्या जवळील खाद्यपदार्थ टाकून त्यांची भूक भागवत आहेत. वन्यप्राण्यांची हेळसांड थांबविण्यासाठी ठिकठिकाणी पानवठे तयार करून त्या पाणवठ्यात पाणी टाकून व त्यांच्या खाद्याची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी वन्य प्रेमींकडून होत आहे. 


भरधाव वाहनांच्या धडकेत वन्य प्राण्यांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण चिंताजनक
घोटभर पाण्यासाठी वन्य प्राणी सैरावैरा धावत आहे. त्यामुळे काही प्राणी वाहनाच्या खाली येवून मृत्युमुखी पडत आहेत. तर काही प्राणी विहिरीत पडून मृत्युमुखी व जखमी होत आहेत. या गंभीर बाबीकडे वन व वन्यजीव विभागाने तातडीने अन् जातीने लक्ष देण्याची गरज आहे. 

वन्यजीव विभागाकडून तातडीने उपाययोजना हवी
कमी पर्जन्य झाल्यामुळे सर्वत्र भूजलपातळी खालावली आहे. परिणामी गायरान जंगलात वास्तव्य करणारे वन्यप्राणी मानवी वस्त्यांकडे धाव घेत आहेत. ही भटकंती रोखण्यासाठी वन्य प्राण्यांसाठी वन विभाग व वन्य जीव विभागाने ठोस उपाय योजना कराव्यात. जेणेकरून वन्य प्राण्यांचा बळी जाणार नाही. 


 


सम्बन्धित सामग्री