पैसे न दिल्याने पोलिसांचा मानसिक छळ, विद्यार्थ्याने संपवले आयुष्य
अकोला : शहर हे शिक्षणाच्या क्षेत्रात वेगाने विकसित होत आहे. जिल्ह्यातील तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थी अकोला शहराकडे आकर्षित होत आहेत. शिक्षण आणि शिकवणी यासारख्या सुविधा नसल्याने अनेक विद्यार्थी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी अकोल्यात स्थलांतर करत आहेत. मात्र, अशाच एका १७ वर्षीय विद्यार्थ्याने आपल्या आयुष्याचा टोकाचा निर्णय घेतला असून या घटनेला पोलीस जबाबदार असल्याचा गंभीर आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.
अकोला शहरातील आकाशवाणी केंद्राच्या मागे असलेल्या जलाराम सोसायटीमध्ये राहणाऱ्या आणि ११वीत शिकणाऱ्या प्रसन्न वानखडे या विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली. तो बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरचा रहिवासी होता आणि NEET परीक्षेची तयारी करत होता. दीड महिन्यांपूर्वी एका विद्यार्थ्यासोबत झालेल्या वादानंतर प्रसन्नला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आले. या प्रकरणात सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने त्याच्याकडून पैशांची मागणी केली होती, असे आरोप कुटुंबीयांनी केले आहेत.
प्रसन्नच्या मामाच्या म्हणण्यानुसार, संबंधित पोलीस अधिकारी वारंवार त्याच्याकडे पैशांसाठी तगादा लावत होता. मात्र, पैसे न दिल्याने त्याला वारंवार पोलीस ठाण्यात बोलावले जात होते आणि मानसिक त्रास दिला जात होता. या जाचाला कंटाळून प्रसन्नने आपले आयुष्य संपवले. या घटनेनंतर कुटुंबीयांनी संबंधित पोलिसांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
प्रसन्न हा शेतकरी कुटुंबातील मुलगा होता. त्याच्या पालकांचे एकमेव स्वप्न म्हणजे तो उच्च शिक्षण घेऊन मोठा अधिकारी व्हावा. या इच्छेने त्यांनी त्याला NEET परीक्षेसाठी अकोल्यात पाठवले होते. मात्र, पोलिसांच्या त्रासामुळे त्याने आत्महत्या केल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले असून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी सर्वत्र होत आहे.