बारामती : भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या वतीने आज बारामतीतील भिगवण चौकात ईव्हीएम मशीनच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात ईव्हीएम मशीनला हार घालून भाजप कार्यकर्त्यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले.
भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी आणि शरद पवारांवर टीका करत त्यांच्यावर देशात वातावरण गढूळ करण्याचा आरोप केला. “शरद पवार यांनी 50-60 वर्षे राज्य केले. मात्र, सत्तेतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी जाती-जातीमध्ये वाद निर्माण करण्याचे राजकारण केले आहे,” असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
कार्यकर्त्यांनी म्हटले की, “लोकसभेच्या निवडणुकीत जातीवादी राजकारण करून विजय मिळवण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु विधानसभेत जनता जागरूक झाली आणि महाविकास आघाडीला नकार दिला. आता ईव्हीएमवर दोषारोप करून लोकशाही धोक्यात आणण्याचा प्रयत्न होत आहे.”