नांदेड : जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात एक अत्यंत दुःखद घटना घडली आहे. कर्जबाजारी शेतकऱ्याने आपल्या मुलाला नवीन कपड्यांसाठी आणि शालेय साहित्यासाठी पैसे न दिल्याने मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आणि त्याच दोरखंडाने हतबल होऊन पित्याने देखील गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे.
बिलोली तालुक्यातील मिनकी येथील 43 वर्षीय राजेंद्र पैलवार यांच्यावर किमान चार लाख रुपयांचे कर्ज होते. या कर्जामुळे आणि सतत होणाऱ्या नापिकीमुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे त्यांना अत्यंत कठीण जात होते. त्यांचा 16 वर्षीय मुलगा ओमकार पैलवार हा उदगीर येथे शिक्षण घेत होता. मकर संक्रांती निमित्त ओमकार गावी आला आणि त्याने वडिलांकडून नवीन कपडे, शालेय साहित्य आणि मोबाईलसाठी पैसे मागितले.
👉👉 जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
राजेंद्र पैलवार यांनी मुलाला पैसे देऊ शकत नसल्यामुळे, "थोडे दिवस थांब, नंतर देतो" असे सांगितले. यावर नाराज होऊन ओमकार याने टोकाचे पाऊल उचलले. त्याने शेतातील लिंबाच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलगा घरी न आल्याने, राजेंद्र पैलवार यांनी शोधाशोध केली आणि शेतात ओमकारचा मृतदेह लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला. हे पाहताच राजेंद्र पैलवार यांना जणू आपला आयुष्याचा आधारच गमावला असल्याचे वाटले आणि त्यांनी देखील त्याच झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
👉👉 हे देखील वाचा : मुंबईत महिलांसाठी पहिल्या फिरत्या स्नानगृहाचं उद्घाटन: पण समोर आली धक्कादायक माहिती