मुंबई: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तानातील 9 अतिरेकी तळांवर जोरदार कारवाई केली. या मोहिमेनंतर पाकिस्तानात आर्थिक अस्थिरता निर्माण झाली, तर भारतात बाजार स्थिर झाला. या घटनांमुळे गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा सोन्याकडे वळत, त्याचा दर उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे.
सोन्याचे भाव पुन्हा लाखाच्या पलीकडे
दिल्लीसह देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या दराने पुन्हा 1 लाख रुपयांची मर्यादा ओलांडली आहे. बुधवारी 99.9% शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत 1,00,770 रुपये इतकी नोंदवली गेली. एक दिवस आधी ही किंमत 99,750 रुपये होती. म्हणजेच एका दिवसात तब्बल 1 हजार रुपयांची वाढ झाली आहे.
99.5% शुद्धतेच्या सोन्यातही वाढ दिसून आली असून त्याचा दर 1,00,350 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला. 22 एप्रिल रोजी सोन्यात 1,800 रुपयांची झपाट्याने वाढ झाली होती. त्यानंतर काही दिवसात सोन्याने ऐतिहासिक पातळी ओलांडत 1,01,600 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार केला होता.
सध्याची अस्थिर जागतिक परिस्थिती पाहता, गुंतवणूकदारांसाठी सोनं एक सुरक्षित पर्याय ठरत आहे. भारतात अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवरही सोन्याची मागणी वाढली होती. मागील काही दिवसांपासून सातत्याने वाढत असलेले दर पाहता, देशांतर्गत बाजारात सोन्याच्या मागणीला मोठा पाठिंबा मिळाल्याचं कळतंय.
जगतिक बाजारात मात्र घसरण
देशांतर्गत बाजारात जिथे सोनं महाग झालं आहे, तिथे जागतिक बाजारात मात्र किंमतीत घसरण दिसून आली आहे. यामागचं प्रमुख कारण म्हणजे अमेरिका-चीन यांच्यातील व्यापार तणावात आलेली सुसंवादाची सुधारणा. तज्ज्ञांच्या मते, जागतिक स्थिरता वाढल्यास सोन्याच्या किंमतीत अजून घसरण होऊ शकते.