BMC Budget 2026: मुंबई महानगरपालिकेत सत्ता स्थापन करताच महायुती सरकारने मोठा आर्थिक निर्णय घेतला आहे. मुंबईचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि रखडलेले पायाभूत प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पालिकेच्या तिजोरीतील 36,623 कोटी रुपयांच्या मुदत ठेवी (FD) मोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्ष असलेल्या ठाकरे गट यांच्यात नवा राजकीय संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.
आकडेवारीचा खेळ: किती ठेवी वापरणार?
आजच्या अर्थसंकल्पातून समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबई महापालिकेकडे सध्या एकूण 81,449 कोटी 32 लाख रुपयांच्या ठेवी आहेत. या निधीचे नियोजन खालीलप्रमाणे असेल:
राखीव निधी: एकूण ठेवींपैकी 44,826 कोटी रुपये हे विविध बांधील दायित्वापोटी राखीव असल्याने त्यांना हात लावला जाणार नाही.
वापरासाठी उपलब्ध निधी: उर्वरित 36,623 कोटी 09 लाख रुपये विविध प्रकल्पांसाठी खर्च केले जाणार आहेत.
"ठेवी चाटायच्या आहेत का?" जुन्या वादाची नवी फोडणी
शिवसेना (UBT) सत्तेत असताना पालिकेच्या ठेवींमध्ये मोठी वाढ झाली होती. मात्र, "जर या पैशांचा उपयोग मुंबईकरांच्या हितासाठी होत नसेल, तर त्या ठेवी काय चाटायच्या आहेत का?" असा आक्रमक सवाल देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारादरम्यान केला होता. आता सत्तेत येताच भाजपने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या सोबतीने या ठेवी मोडून विकासकामांचा वेग वाढवण्याचे धोरण स्वीकारले आहे.
हा निधी प्रामुख्याने खालील कामांसाठी वापरला जाईल:
रस्ते आणि पुलांचे बांधकाम.
नवीन शालेय इमारतींची उभारणी.
नागरी वाहतूक प्रकल्पांचे सक्षमीकरण.
हेही वाचा - BMC Education Budget: मुंबई महापालिका शिक्षणासाठी 4248 कोटींची तरतूद; डिजिटल क्लासरूमपासून सायबर शिक्षण, CCTV आणि आधुनिक सुविधा अशा मोठ्या घोषणा
ठाकरे गटाचा 'डल्ला' मारल्याचा आरोप; श्वेतपत्रिकेची मागणी
महायुतीच्या या निर्णयावर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी तीव्र शब्दांत टीका केली आहे. त्या म्हणाल्या, "आम्ही सत्ता सोडली तेव्हा 91,000 कोटींच्या ठेवी ठेवल्या होत्या. प्रशासकीय राजवटीत या ठेवींचे काय झाले? किती कोटी मोडले? याची श्वेतपत्रिका काढायला हे सरकार घाबरत आहे. विकासाच्या नावाखाली मुंबईकरांच्या कष्टाच्या पैशांवर डल्ला मारण्याचा हा प्रयत्न असून आमचा याला कडाडून विरोध असेल."