Mumbai BEST Buses: मुंबईची दुसरी जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या 'बेस्ट'च्या ताफ्यात लवकरच मोठी वाढ होणार आहे. प्रवाशांची वाढती संख्या आणि बसेसची भासणारी कमतरता लक्षात घेता, चालू वर्षात बेस्टच्या ताफ्यात सुमारे 2,000 ते 2,500 नवीन बसेस दाखल होणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने भाडेतत्त्वावरील इलेक्ट्रिक बसेसचा (E-buses) समावेश असून, यामुळे मुंबईकरांचा दैनंदिन प्रवास अधिक सुलभ आणि प्रदूषणमुक्त होण्यास मदत होणार आहे.
केंद्र सरकार आणि कंत्राटदारांकडून होणार पुरवठा
ताफ्यात येणाऱ्या या अडीच हजार बसेसपैकी 1,500 बसेस केंद्र सरकारच्या विशेष उपक्रमांतून उपलब्ध होणार आहेत. उर्वरित बसेस विविध कंत्राटदारांकडून भाडेतत्त्वावर घेतल्या जाणार आहेत. सध्या बेस्टकडे स्वतःच्या आणि कंत्राटी अशा एकूण 2,700 बसेस कार्यान्वित आहेत. मात्र, मुंबईतील प्रवाशांच्या अफाट संख्येच्या तुलनेत ही बससंख्या अपुरी पडत असल्याने नवीन बसेसचा हा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा - Eknath Shinde : इथून पुढे फक्त 'क्वॉलिटी'वर भर! एकनाथ शिंदेंचा संघटना बांधणीसाठी नवा प्लॅन; अकार्यक्षम नेत्यांना थेट...
बससंख्या 3,500 च्या पार जाण्याची शक्यता
नवीन बसेस दाखल झाल्यानंतर बेस्टच्या ताफ्यातील एकूण बससंख्या 3,500 च्या पार जाण्याची शक्यता आहे. गेल्या काही काळापासून जुन्या बसेस निकामी होणे आणि नवीन बसेस येण्यास होणारा विलंब यामुळे प्रवाशांना बराच वेळ बसची वाट पाहावी लागत होती. नवीन 2,500 बसेसमुळे गाड्यांच्या फेऱ्या वाढतील आणि प्रवाशांची गर्दी कमी होण्यास मदत होईल. विशेषतः पर्यावरणपूरक ई-बसेसवर भर दिल्याने बेस्टच्या इंधन खर्चातही बचत होणार आहे.