मुंबई: आज सकाळी जनतेचा युद्धसज्जतेचा सराव करण्यात आला. मुंबईच्या दादर परिसरातील डिसिल्वा शाळेत सकाळी नऊ वाजता सायरन वाजवण्यात आला. नागरिकांना संभाव्य हल्ल्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्यांना युद्धसरावाचे निर्देश दिले आहेत.
मुंबईत अनेक ठिकाणी एकाचवेळी सकाळी 9 वाजता सायरन वाजवण्यात आले. यामध्ये आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी कसे वागावे, त्यासाठी कोणती दक्षता घ्यावी याचा सराव करण्यात आला. डिसिल्वा शाळेसह विविध ठिकाणी सायरन तपासणीही करण्यात आली.
भारत-पाकिस्तान आणि भारत-चीन दरम्यान युद्धसदृश परिस्थितीत अशा प्रकारचे सायरन यापूर्वी लावण्यात आले होते. सध्या भारत-पाक तणाव व मॉक ड्रिलच्या पार्श्वभूमीवर हे सायरन वाजवण्यात आले.
सरावाचा उद्देश नागरिकांमध्ये सजगता निर्माण करून आपत्कालीन तयारीची चाचपणी करणे हा आहे. केंद्र सरकारकडून अशा सरावांना महत्त्व देण्यात आलं आहे
देशभरात जनतेचा ‘युद्धसराव’
पहलगाम येथे झालेल्या भीषण हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातील सर्व राज्यांना 7 मे रोजी युद्धसज्जतेच्या दृष्टीने ‘मॉक ड्रिल’ म्हणजेच युद्धस्थितीत नागरिकांनी आणि यंत्रणांनी कशी तयारी ठेवावी याचा सराव करण्याचे निर्देश दिले आहेत.
माहितीनुसार, या मॉक ड्रिलमध्ये नागरिकांना हवाई हल्ल्याचा सायरन ऐकून योग्य प्रतिसाद देणे, सुरक्षित जागी स्थलांतर करणे, अंधारात राहणे (ब्लॅकआऊट), तसेच महत्त्वाच्या ठिकाणांची सुरक्षा यांसारख्या गोष्टींचा समावेश असणार आहे. विशेष म्हणजे, ही कवायत ही केवळ शासकीय अधिकाऱ्यांसाठीच नव्हे तर सामान्य जनतेलाही युद्धकाळात आपले संरक्षण कसे करायचे, याचे प्रशिक्षण देण्यासाठी असेल.