Sunday, March 08, 2026 10:48:57 PM

Mumbai-Ahmedabad Bullet Train: विरारचा चेहरामोहरा बदलणार, बुलेट ट्रेन स्थानकासाठी 'व्हेलो सिटी'चा मेगा प्लॅन; सायकलला मिळणार प्राधान्य

केवळ रेल्वे स्थानकच नाही, तर संपूर्ण परिसराचा विकास 'शाश्वत आणि पर्यावरणपूरक' पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

mumbai-ahmedabad bullet train विरारचा चेहरामोहरा बदलणार बुलेट ट्रेन स्थानकासाठी व्हेलो सिटीचा मेगा प्लॅन सायकलला मिळणार प्राधान्य

Mumbai-Ahmedabad Bullet Train: मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे (Bullet Train) प्रकल्पांतर्गत पालघर जिल्ह्यातील विरार स्थानकाच्या विकासाचा मास्टरप्लॅन आता समोर आला आहे. केवळ रेल्वे स्थानकच नाही, तर संपूर्ण परिसराचा विकास 'शाश्वत आणि पर्यावरणपूरक' पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्थेच्या (JICA) मदतीने हे महत्त्वाकांक्षी केंद्र साकारले जाणार आहे.

'व्हेलो सिटी' (Velo City): पर्यावरणाचे रक्षण आणि सायकलिंगला महत्त्व
या प्रकल्पाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे विरार स्थानक परिसर 'व्हेलो सिटी' म्हणून ओळखला जाईल.

सायकल स्नेही परिसर: या ठिकाणी सायकल चालवणाऱ्यांसाठी विशेष व्यवस्था असेल, ज्यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.
इको-फ्रेंडली हब: हे स्थानक केवळ वाहतुकीचे केंद्र न राहता एक निसर्गपूरक शहरी केंद्र म्हणून विकसित होईल.

कुठे होणार स्थानकाची उभारणी?
राज्यात प्रस्तावित असलेल्या 4 (BKC, ठाणे, विरार, बोईसर) स्थानकांपैकी विरार स्थानक हे नालासोपारा पूर्वेकडील वालईपाडा (पेल्हार) येथे उभारले जाणार आहे. सुमारे 465 हेक्टर क्षेत्रावर या प्रकल्पाचा विस्तार असेल.

विकासाचे 3 टप्पे:
टप्पा 1: अत्याधुनिक बुलेट ट्रेन स्थानकाची प्रत्यक्ष उभारणी.
टप्पा 2: स्थानकाच्या लगतच्या क्षेत्राचा नागरी आणि व्यावसायिक विकास.
टप्पा 3: स्थानक कार्यान्वित झाल्यानंतर पुढील 5 वर्षांत मध्यम ते कमी घनतेच्या निवासी वसाहतींची उभारणी.

हेही वाचा - 10,000 प्रवाशांनी मिळवले NCMC स्मार्ट कार्ड; ST च्या 35 प्रकारच्या सवलतींसाठी लागणाऱ्या कार्डची नोंदणी तुम्ही केली का?

आव्हाने आणि नियोजनाचा आढावा
या प्रकल्पाच्या अंमलबजावणीत काही तांत्रिक अडचणीही आहेत. नियोजित क्षेत्रातील 30 टक्के भाग वनजमिनीत येतो, तर बराचसा भाग 'ग्रीन झोन' मध्ये आहे. जमिनीची खाजगी मालकी आणि बेकायदा बांधकामे ही मोठी आव्हाने असून, त्याबाबत संयुक्त समन्वय समितीला कळवण्यात आले आहे. दरम्यान, सोमवारी वसई-विरार महापालिका मुख्यालयात 'जायका' (JICA) प्रतिनिधी आणि पालिकेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी माजी आमदार क्षितीज ठाकूर, आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी आणि महापौर अजीव पाटील यांनी प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला.


सम्बन्धित सामग्री