Sunday, February 15, 2026 08:24:08 AM

BMC Election 2026 : मतदानादिवशी ठाकरे बंधूंचा 'भगवा गार्ड' मैदानात; 2 हजार जणांची नियुक्ती

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुबार, बोगस आणि मतचोरी रोखण्यासाठी ठाकरे गटाची शिवसेना आणि मनसे सज्ज झाली आहे.

bmc election 2026  मतदानादिवशी ठाकरे बंधूंचा भगवा गार्ड मैदानात 2 हजार जणांची नियुक्ती

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुबार, बोगस आणि मतचोरी रोखण्यासाठी ठाकरे गटाची शिवसेना आणि मनसे सज्ज झाली आहे. मतदानादिवशी म्हणजेच 15 जानेवारीला मुंबईतील प्रत्येक मतदान केंद्राबाहेर ‘भगवा गार्ड’ तैनात करण्यात येणार असून सुमारे 2 हजार जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान प्रक्रियेतील गैरप्रकारांवर करडी नजर ठेवण्याचे काम हे पथक करणार आहे. रविवारी छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे झालेल्या जाहीर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याचे आवाहन करत दुबार मतदानाच्या प्रकारांवर कडक भूमिका जाहीर केली. “सतर्क रहा, बेसावध राहू नका,” असे सांगत त्यांनी दुबार मतदान आढळल्यास तात्काळ हस्तक्षेप करण्याचे निर्देश दिल्याचे त्यांनी सभेत नमूद केले. मुंबई आणि ठाण्यातील सभांमधूनही त्यांनी बोगस मतदानाविरोधात आक्रमक भूमिका मांडली.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर विरोधकांकडून मतचोरीच्या मुद्द्यावर भाजपवर सातत्याने टीका करण्यात आली होती. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यानंतर युवासेना नेते आदित्य ठाकरे यांनीही सादरीकरण करत मतचोरीचा मुद्दा उपस्थित केला होता. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने मुंबईत मोर्चाही काढला होता. आता महापालिका निवडणुकीत दुबार मतदान रोखण्यासाठी ठाकरे बंधूंनी कडक इशारा दिल्याचे चित्र आहे. दोन्ही पक्षांच्या निर्णयानुसार शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांचे ‘भगवा गार्ड’ हे विशेष पथक प्रत्येक मतदान केंद्राजवळ व आसपासच्या परिसरात कार्यरत राहणार आहे. निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेली दुबार मतदारांची यादी या पथकांना देण्यात येणार असल्याची माहिती आहे. मुंबईतील प्रत्येक मतदान केंद्रावर दुबार मतदारांना रोखण्यासाठी हे पथक तैनात असणार आहे.

हेही वाचा : Ajit Pawar : 'दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण होणार?'; अजित पवारांचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?

आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत बोरिवलीतील देवीपाडा मैदानात ‘भगवा गार्ड’चे लोकार्पण करण्यात आले. मनसेकडून या गार्ड्सना विशेष प्रशिक्षण देण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले. मतदान केंद्रांवर दुबार किंवा बोगस मतदानाचा प्रयत्न आढळल्यास तात्काळ कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. सकाळपासूनच विशेष लक्ष ठेवण्यात येणार असून, यासाठी भरारी पथकही तयार करण्यात आल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली. दरम्यान, ‘भगवा गार्ड’च्या तैनातीमुळे मतदानादिवशी कायदा-सुव्यवस्थेवर आणि निवडणूक प्रक्रियेवर प्रशासनाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.


सम्बन्धित सामग्री