Monday, June 15, 2026 02:00:00 AM

Amol Mitkari : 'झाडाला बोकड लटकवलं, ईशान्येश्वर मंदिरात अघोरी पूजा अन् विमानाचा अपघात...'; अमोल मिटकरींच्या दाव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार अमोल मिटकरी यांनी या अपघाताचा संबंध अघोरी पूजा आणि अंधश्रद्धेशी जोडत अत्यंत खळबळजनक आरोप केले आहेत.

amol mitkari  झाडाला बोकड लटकवलं ईशान्येश्वर मंदिरात अघोरी पूजा अन् विमानाचा अपघात अमोल मिटकरींच्या दाव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ

Amol Mitkari: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला झालेल्या अपघाताच्या चौकशीला आता एक वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार अमोल मिटकरी यांनी या अपघाताचा संबंध अघोरी पूजा आणि अंधश्रद्धेशी जोडत अत्यंत खळबळजनक आरोप केले आहेत. "अजित दादांच्या विमान अपघाताचा धागादोरा ईशान्येश्वर मंदिर आणि तेथील तथाकथित भोंदूबाबाशी संबंधित आहे का, याची सखोल चौकशी व्हावी," अशी मागणी मिटकरी यांनी केली आहे.

पोटनिवडणुकीच्या प्रचारात गावकऱ्यांचा दावा
बारामती परिसरात पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान गावकऱ्यांशी संवाद साधताना अनेक धक्कादायक बाबी समोर आल्याचे मिटकरी यांनी सांगितले. ते म्हणाले, "अजित दादांच्या विमानाला जो अपघात झाला, त्यामागे केवळ तांत्रिक बिघाड नसून काहीतरी काळं-बेरं असल्याची शंका गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री आणि स्वतः सुनेत्रा वहिनींनीही या तपासाबाबत भाष्य केले आहे, त्यामुळे आता हा तपास 'फास्ट ट्रॅक'वर होणे गरजेचे आहे."

काटेवाडीच्या बंगल्याजवळ अघोरी प्रकार?
अंधश्रद्धेच्या काही भयानक प्रकारांचा उल्लेख करत मिटकरी म्हणाले, "काटेवाडी येथील दादांच्या बंगल्याशेजारील शेताच्या बांधावर एका झाडाला बोकड लटकवल्याचा प्रकार काही लोकांनी पाहिला आहे. ही घटना साधारण 21 जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास घडल्याची माहिती आहे. तसेच, एका कॉलेजच्या उद्घाटनावेळी दादांच्या नावाने बाहुल्या पुरणे आणि त्यांच्या फोटोंना सुया टोचणे, असे संशयास्पद प्रकारही घडले आहेत. हे सर्व प्रकार आणि 28 जानेवारीला झालेला विमान अपघात यांचा काही संबंध आहे का, याची तपासणी होणे आवश्यक आहे."

ईशान्येश्वर मंदिराच्या चौकशीची मागणी
मिटकरी यांनी थेट कॅप्टन अशोक खरात नावाच्या व्यक्तीचा आणि ईशान्येश्वर मंदिराचा उल्लेख करत तपासाची दिशा स्पष्ट केली. "दादा हे स्वतः प्रचंड विज्ञानवादी आहेत, पण त्यांच्या विरोधात काही राजकीय पुढारी आणि ईशान्येश्वर मंदिराशी संबंधित भक्त संप्रदायाने अघोरी पूजा केल्याची दाट शंका आहे. बारामतीच्या बाहेरची व्यक्ती येऊन येथे अशी हिंमत करू शकत नाही, त्यामुळे स्थानिक लोकांचा यात हात आहे का, हे समोर आले पाहिजे," असे मिटकरी म्हणाले.

हेही वाचा - Sanjay Nirupam : शिवसेनेमध्ये मराठी सक्तीवरून दोन गट; सरनाईकांच्या निर्णयाला निरुपमांचा विरोध

मुख्यमंत्र्यांना निपक्षपाती तपासाची विनंती
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अमोल मिटकरी यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की, या प्रकरणाची चौकशी तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली निपक्षपातीपणे व्हावी. ईशान्येश्वर मंदिरातील आघोरी पूजा आणि विमानाचा अपघात यातील अँगल महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणणे गरजेचे असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले आहे. 


सम्बन्धित सामग्री