Ajit Pawar on Navi Mumbai International Airport: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधण्याची घोषणा झाल्यापासून नवी मुंबईसह आसपासच्या भागात राहणाऱ्या लोकांनी सातत्याने या विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याची मागणी केली आहे. या मुद्द्यावर आज माध्यमांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली.
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
अजित पवार म्हणाले, "आधी विमानतळ चालू होऊ द्या. विमानांच्या उड्डाणास अद्याप 45 दिवस बाकी आहेत. मान्यवरांनी तारीख दिल्यानंतर उद्घाटन केलं की पुढच्या गोष्टी गतीने व्हायला मदत होते. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ताण खूप वाढला आहे. तो ताण कमी करण्यासाठी आपण हे विमानतळ बांधलं आहे."
हेही वाचा: New Sand Policy: घर बांधकामाचा खर्च होणार कमी, वाळू धोरणात मोठा बदल, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
पुढे बोलताना, "केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री के. नायडू यांच्यासमोर आम्ही वाढवण येथील विमानतळाचा विषय काढला. त्याचेही काम लवकर सुरू होईल. वाढवण विमानतळ बांधायला सुद्धा चार ते पाच वर्षे लागतील. मुंबईसारखंच एक शहर तिथे उभं करायचं आहे. तिथे राहणाऱ्या नागरिकांना जगात, देशात व राज्याच्या कानाकोपऱ्यात संपर्क साधणं सोपं झालं पाहिजे. नवी मुंबई विमानतळावरून दरवर्षी नऊ कोटी प्रवासी प्रवास करतील."
अजित पवार यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देणार की हे नाव बदलणार या विषयावर बोलताना, अजून या विमानतळावरून उड्डाणं सुरू झालेली नाहीत. थोडं थांबा, यावर सरकार लोकमताचा विचार करून निर्णय घेण्यात येईल असे म्हटले आहे.