मुंबई : राज्याच्या राजकारणात गेल्या काही वर्षांमध्ये पक्ष फोडीचं समीकरण पाहायला मिळालं. आधी शिवसेनेतील ४० आमदार एकनात शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाहेर पडले. तर नंतर राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांच्यासोबत पक्षातून बाहेर पडले. दोन्ही पक्षांतील बंडखोर नेत्यांनी भाजपसोबत महायुती करून सत्ता स्थापन केली. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेतील नेते भास्कर जाधव यांनी मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची साथ मात्र सोडली नाही. याबाबत त्यांच्या जय महाराष्ट्रच्या एन्काऊंटर कार्यक्रमात प्रश्न विचारला असता त्यांनी याच कारण सांगितलं. मूळात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांना सोडून आधीच एक चूक केली होती. त्यामुळे नंतर शिवसेना फुडल्यानंतर उद्धव ठाकरेंची साथ सोडणं त्यांना पडलं नाही, असे ते म्हणाले. भास्कर जाधव यांनी यावेळी प्रांजळ कबुली दिली. ते म्हणाले की, ''राष्ट्रवादी ही माझ्याकडून सोडली जायला नको होती. राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा मी पवारसाहेबांना सोडायला नको होतं. आता जो पवारसाहेबांचा पक्ष फुटला त्यावेळी मी पवारसाहेबांच्याच बाजूला उभं राहिलं पाहिजे होतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून एक चूक मी आयुष्यात केली होती. त्यांनी मला खूप काही दिलं तरी मी तो पक्ष सोडला. त्यामुळे एकदा चूक झाली, पुन्हा चूक करायची नाही, हे मी ठाकपणे ठरवलं होतं. त्यामुळे अडचणीच्या काळामध्ये मी उद्धवसाहेबांच्या बरोबरच राहिलो.''
हेही वाचा : Nashik Leopard Found : तो पुन्हा आला! रहिवासी भागात बिबट्याची घुसखोरी; भिंतीवरून उडी मारतानाचा व्हिडिओ व्हायरल