मुंबई: गेल्या काही वर्षांपासून अनेक नेत्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश केला आहे. अशातच, शिवसेनेतून (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणखी एक नेता पक्ष सोडणार असल्याची चर्चा रंगत आहे. नुकताच, पैलवान चंद्रहार पाटील यांनी कुडाळमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. इतकंच नाही, तर पैलवान चंद्रहार पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पंक्तीत बसून जेवणाचा आस्वाददेखील घेतला. मात्र, या भेटीमुळे पैलवान चंद्रहार पाटील आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार का? अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे.
यावर, पैलवान चंद्रहार पाटील यांनी फेसबुकवर पोस्ट करत म्हणाले की, 'राजकीय डावपेच पेक्षा, ज्या क्रीडा क्षेत्राने मला ही ओळख दिली आहे, ते माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे. राज्याच्या क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी शासनातील महत्वाच्या व्यक्तींची भेट घेण्यात मला काही गैर वाटत नाही. यापुढे गरज भासल्यास क्रीडा क्षेत्रासाठी कुणाचीही भेट घेण्यात मला संकोच वाटणार नाही', असे त्यांनी सांगितले.
पाटलांनी घेतली शिंदेंची भेट
गुरुवारी, पैलवान चंद्रहार पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यासोबतच, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मध्यस्थी केल्यामुळे ही भेट घडून आली. या भेटीमुळे पैलवान चंद्रहार पाटील आता उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडून जाणार का? अशी राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. एकेकाळी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पैलवान चंद्रहार पाटील यांच्यासाठी काँग्रेससोबत वैर केला होता. मात्र, आता तेच पैलवान चंद्रहार पाटील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गळाला लागल्याची चर्चा आहे.
हेही वाचा: धर्म विचारूनच वस्तू खरेदी करा; मंत्री नितेश राणेंचं वक्तव्य
उद्धव ठाकरेंचा काँग्रेसशी पंगा
लोकसभा निवडणुकीदरम्यान सांगलीची जागा चर्चेत होती. सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडी तुटणार की काय? अशी चर्चा रंगत होती. याचं कारण म्हणजे पैलवान चंद्रकांत पाटलांची उमेदवारी. कोल्हापूरमधील ठाकरेंची जागा काँग्रेसच्या शाहू महाराजांना देण्यात आली होती. कोल्हापूरच्या जागेच्या बदल्यात उद्धव ठाकरेंनी सांगलीच्या जागेवर दावा केला आणि त्यासोबतच पैलवान चंद्रकांत पाटलांची उमेदवारी घोषित केली. त्याच जागेवर काँग्रेसचे विशाल पाटील तयारी करत होते आणि त्यांच्यासोबत विश्वजीत कदमांची ताकद होती. कोणत्याही परिस्थितीत सांगलीची जागा आपल्याकडेच राहिली पाहिजे, यासाठी उद्धव ठाकरे यांनी खूप आग्रह केला होता. यासाठी त्यांनी काँग्रेससोबत खुलेआम पंगा घेतला. त्यामुळे विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांनी दिल्ली गाठली. मात्र, भाजपचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीने एकत्रित लढणे गरजेचे असल्यामुळे त्यांना काँग्रेसकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी, शेवटी ही जागा उद्धव ठाकरेंकडेच गेली.