मुंबई: राज्यात सध्या तथाकथित आध्यात्मिक व्यक्तींच्या वक्तव्यांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. नागपूर येथे झालेल्या कार्यक्रमात बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री यांनी केलेल्या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. “मुलांना जन्म देऊन एक मुलगा राष्ट्रीय स्वयंसेवक संघात पाठवा,” असे त्यांनी म्हटल्याने वाद निर्माण झाला आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांबाबतही त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने, त्यावर राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर मंत्री संजय शिरसाट यांनी बागेश्वर बाबांवर जोरदार टीका केली आहे. “त्यांना काही माहिती आहे का? त्यांनी बाबागिरी सोडून थेट राजकारणात यावे,” असा टोला त्यांनी लगावला. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत बोलण्यापूर्वी महाराजांचे चरित्र नीट वाचावे, असेही त्यांनी सुनावले.
हेही वाचा: High Profit Film: फक्त 12 लाखांचं बजेट अन् 1600 कोटींची कमाई! 'या' हॉरर सिनेमानं रचला इतिहास; पाहा कशी घडली ही किमया
मंत्री शिरसाट पुढे म्हणाले की, “जनसमुदाय तुमचे बोलणे ऐकतो म्हणून कोणतीही वाक्ये वापरून लोकांना भडकवण्याचा प्रयत्न करू नये.” समाजात तणाव निर्माण होईल असे वक्तव्य टाळण्याचा सल्लाही त्यांनी दिला. त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे हा वाद आणखी तीव्र झाला आहे.
दरम्यान, बागेश्वर बाबांच्या वक्तव्यावरून राज्यातील विविध राजकीय पक्षांकडून निषेध नोंदवला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कोणतेही आक्षेपार्ह विधान सहन केले जाणार नाही, अशी भूमिका अनेक नेत्यांनी घेतली आहे.
एकूणच, धीरेंद्र शास्त्री यांच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेला हा वाद आता कोणत्या दिशेने वळतो, तसेच ते या प्रकरणावर माफी मागतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा: Donald Trump Secret Security: साधा वेश, कोणालाही अंदाज लावता येणार नाही अशी देहबोली...; ट्रम्प यांच्यासोबत असलेली सिक्युरिटी असते 'सिक्रेट'