पुणे: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असतानाच या अपघाताबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अपघात नेमका कसा घडला याबाबत राजकीय वर्तुळात संशय व्यक्त केला जात असून सखोल चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी घातपाताचा संशय व्यक्त करत विविध घटनांचा उल्लेख प्रेझेंटेशनच्या माध्यमातून समोर आणला होता. तसेच आमदार भास्कर जाधव यांनीही या विमान अपघातावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हा केवळ अपघात नसण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
हेही वाचा: Maharashtra Budget Session: आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात; कोणते विषय ठरणार चर्चेचे केंद्रबिंदू?
अजित पवार यांच्या निधनामागील सत्य समोर यावे आणि अपघाताची निष्पक्ष चौकशी व्हावी, या मागणीसाठी पुणे जिल्ह्यातील काही गावांमध्ये काल बंदही पाळण्यात आला होता. त्यामुळे या प्रकरणाला अधिकच राजकीय आणि सामाजिक महत्व प्राप्त झाले आहे. या प्रकरणावर लवकरच चौकशी अहवाल सादर केला जाईल असे आश्वासन सरकारने दिले आहे.
दरम्यान, या सर्व घडामोडींनंतर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रथमच या प्रकरणावर अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारलेल्या सुनेत्रा पवार यांनी सांगितले की, विमान अपघाताच्या चौकशीसंदर्भात सविस्तर खुलासा करण्यात यावा, यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. चौकशीअंती जे काही सत्य आहे ते समोर येईल असे त्या म्हणाल्या.
अपघाताची सखोल आणि पारदर्शक चौकशी करून सत्य जनतेसमोर आणण्याची अपेक्षा सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली. आता मुख्यमंत्री या पत्राला काय प्रतिसाद देतात आणि तपास अहवालातून नेमकी कोणती माहिती समोर येते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा: Tejas Jet Grounded: तेजस जेटचा पुन्हा अपघात! लँडिंगदरम्यान विमान धावपट्टीवरून घसरले; ब्रेक फेल झाले अन्...