Bawankule on Harshvardhan Sapkal: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांच्या संदर्भात केलेल्या विधानावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सपकाळ यांच्यावर कडक शब्दांत प्रहार केला असून, त्यांची तुलना थेट मुघलांशी केली आहे. "मुघलांच्या काळानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतका मोठा अपमान करणारा हर्षवर्धन सपकाळ हा दुसरा व्यक्ती निघाला आहे," अशी जळजळीत टीका बावनकुळे यांनी केली.
सपकाळ यांनी तातडीने राजीनामा द्यावा
बावनकुळे यांनी सपकाळ यांच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ते म्हणाले की, "ज्या शहरात जातील त्या ठिकाणी सपकाळ यांचा निषेधच होईल. त्यांनी या पदावर राहण्याचा अधिकार गमावला असून तातडीने राजीनामा दिला पाहिजे. अशा कृती करणारे लोक 'मेंटल' झाले आहेत, त्यांच्या डोक्यात फरक पडलेला आहे. अशा मानसिकतेच्या लोकांना महाराष्ट्रात फिरण्याचा कोणताही अधिकार नाही."
हेही वाचा - Harshwardhan Sapkal : शिवरायांबद्दल ते वक्तव्य, वाद पेटला; सपकाळांकडून आता सारवासारव
राहुल गांधींना 3 दिवसांचा अल्टिमेटम
या प्रकरणात बावनकुळे यांनी थेट काँग्रेस नेते राहुल गांधी यांना साकडे घातले आहे. "मी राहुल गांधींच्या भूमिकेची वाट बघत आहे. राहुल गांधींनी पुढच्या 3 दिवसांमध्ये हर्षवर्धन सपकाळ यांचा राजीनामा घेतला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान काँग्रेसला मान्य आहे का, हे आता राहुल गांधींनी स्पष्ट करावे," असे आवाहन बावनकुळे यांनी दिले. तसेच, संजय राऊत या प्रकरणावर गप्प का आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, सपकाळ यांच्या विधानाचा समाचार घेताना बावनकुळे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. "तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतानशी करून महाराजांचा अपमान करत आहात. शिवरायांची बरोबरी कोणाशीही होऊ शकत नाही, हे काँग्रेसने लक्षात ठेवावे," असेही बावनकुळे यांनी न सांगितले आहे.