Devendra Fadnavis On Loan Waiver: मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांसह शेतजमिनी, जनावरे आणि सिंचन व्यवस्थेचेही प्रचंड नुकसान झाले. राज्य सरकारने तातडीचे मदतपॅकेज जाहीर केले असले तरी प्रत्यक्षात झालेल्या नुकसानीच्या तुलनेत ही मदत अपुरी असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी नुकतेच मराठवाड्याचा दौरा करून शेतकऱ्यांची भेट घेतली आणि मदतपॅकेज योग्य प्रकारे पोहोचते आहे का याची माहिती घेतली. तसेच त्यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारने सरसकट कर्जमाफी करावी, अशी मागणी जोरदारपणे पुढे मांडली. या सर्व चर्चेच्या केंद्रस्थानी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी महत्त्वाचे विधान केले असून त्यांच्या वक्तव्याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.
कर्जमाफी उपाय नाही, शाश्वत शेतीच अंतिम उत्तर - देवेंद्र फडणवीस
दरम्यान, फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यासाठी नैसर्गिक शेतीचे मोठे ध्येय दिले आहे. त्यानुसार राज्यातील 25 हजार हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी बी-बियाणे कंपन्यांशीही सरकारने चर्चा सुरू केली असल्याचे त्यांनी सांगितले. कर्जमाफीच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, “कर्जमाफी नक्कीच महत्त्वाची आहे, पण ती शेती समस्यांचे अंतिम समाधान ठरत नाही. खरी गरज आहे ती शेतीमध्ये शाश्वतता निर्माण करण्याची. शेतकऱ्यांच्या उत्पादनाचा खर्च कमी झाला पाहिजे आणि उत्पन्न वाढवण्यासाठी आधुनिक शेती पद्धतींचा वापर आवश्यक आहे.”
हेही वाचा - Thackeray Shinde Yuti : नगरपरिषदेसाठी कट्टर शत्रू एकत्र, ठाकरे-शिंदे गटाची हातमिळवणी; राजकीय विश्लेषकांना घाम
दरम्यान, फडणवीस यांनी सांगितले की, राज्य सरकारने स्मार्ट शेतीसह विविध आधुनिक प्रकल्प हाती घेतले असून, यांच्याद्वारे शेती फायदेशीर करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. तथापी, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी त्यांनी त्यांना अभिवादन करताना या योजनांबद्दल माहिती दिली.
हेही वाचा - Sanjay Raut : तोंडाला मास्क पण तोच करारी बाणा; आजारपणातही संजय राऊत बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी
कर्जमाफीवरून निर्माण झालेला वाद
यापूर्वीही देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, जूनमध्ये कर्जमाफी जाहीर केल्यास त्याचा मुख्य फायदा शेतकऱ्यांऐवजी बँकांना होईल. त्यांच्या या वक्तव्यावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. त्यातच केंद्राच्या पथकाकडून नुकसानीचे सर्वेक्षण उशिरा झाल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. मराठवाड्यातील प्रचंड नुकसान, अपुरी मदत, आणि कर्जमाफीसंदर्भातील राजकीय चर्चा या सर्वांवर फडणवीसांनी केलेल्या ताज्या विधानामुळे विरोध आता अधिक आक्रमक भूमिका घेतील का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तथापी, प्रशासन शाश्वत शेतीकडे वाटचाल करण्याचे चित्र दाखवत असले तरी शेतकरी मात्र कर्जमाफीच्या ठोस निर्णयाची प्रतीक्षा करत आहेत.