Saturday, March 07, 2026 05:55:40 AM

Aditya Thackeray: 'मुंबईचे प्रश्न वाऱ्यावर, महापौरांचे लक्ष फक्त बांगलादेशींकडे...'; आदित्य ठाकरेंचा भाजप आणि नवनिर्वाचित महापौरांवर निशाणा

केंद्रात गेल्या 10 वर्षांपासून भाजपचे सरकार असताना देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत आणि भाजपशासित राज्यांतून बांगलादेशी मुंबईत पोहोचलेच कसे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

aditya thackeray मुंबईचे प्रश्न वाऱ्यावर महापौरांचे लक्ष फक्त बांगलादेशींकडे आदित्य ठाकरेंचा भाजप आणि नवनिर्वाचित महापौरांवर निशाणा

Aditya Thackeray : मुंबईतील नवनिर्वाचित महापौरांनी नागरी प्रश्नांकडे दुर्लक्ष करून केवळ बांगलादेशी घुसखोरांच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित केल्याबद्दल शिवसेना (ठाकरे गट) नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे. केंद्रात गेल्या 10 वर्षांपासून भाजपचे सरकार असताना देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत आणि भाजपशासित राज्यांतून बांगलादेशी मुंबईत पोहोचलेच कसे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

'मुंबईचे नागरी प्रश्न वाऱ्यावर, महापौरांचे लक्ष दुसरीकडेच'
आदित्य ठाकरे यांनी ट्विटद्वारे मुंबईच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले आहे. मुंबईत सध्या खोदून ठेवलेले रस्ते, कचऱ्याचे ढीग, चालण्यायोग्य नसलेले फूटपाथ, मोकळ्या जागांवर बिल्डरांनी केलेली अतिक्रमणे आणि पाणी-हवेचे वाढते प्रदूषण असे गंभीर नागरी प्रश्न उभे आहेत. मात्र, महापौरांना या मूलभूत सुविधांपेक्षा बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न अधिक महत्त्वाचा वाटत असल्याची खोचक टीका आदित्य ठाकरेंनी केली. "हा विषय केंद्र आणि राज्य गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत येतो, कदाचित महापौरांना हे विभाग आपल्याकडेच आहेत असे वाटत असावे," असा टोलाही त्यांनी लगावला.

हेही वाचा - NCP Merger: 'आमच्या पक्षात लुडबूड नका करू'; विलिनीकरणाच्या चर्चेवरून राष्ट्रवादीचा विरोधकांना कडक इशारा

घुसखोरी हा भाजपच्या राष्ट्रीय सुरक्षेचे अपयश
बांगलादेशी घुसखोरांचा दावा जर खरा असेल, तर ही बाब राष्ट्रीय सुरक्षेतील मोठे अपयश असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. भाजपला उद्देशून त्यांनी काही मूलभूत प्रश्न विचारले आहेत. जर बांगलादेशी नागरिक बेकायदेशीरपणे शिरले असतील, तर ते सीमेवरून देशात आलेच कसे भाजपशासित राज्यांतून प्रवास करत ते मुंबईपर्यंत सुरक्षितपणे पोहोचले कसे? केंद्रात 10 वर्षांपासून भाजपची सत्ता असताना इतकी वर्षे ते कोणाच्या वरदहस्ताने इथे राहिले? हे गुप्तचर यंत्रणेचे अपयश आहे की प्रशासकीय निष्काळजीपणा, असा सवाल त्यांनी विचारला आहे.

'निवडणुकीपुरतेच POK चे नारे, प्रत्यक्षात सुरक्षेत खिंडार'
भाजपवर हल्लाबोल करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, प्रत्येक निवडणुकीत POK (पाकव्याप्त काश्मीर) ताब्यात घेण्याच्या बाता मारणारे भाजप सरकार प्रत्यक्षात बांगलादेशी घुसखोरांना रोखण्यात अपयशी ठरले आहे. घुसखोरांना रोखण्यात, ओळखण्यात आणि देशाबाहेर काढण्यात आलेल्या अपयशासाठी केवळ भाजपच जबाबदार आहे. प्रत्येक अपयशाचा इव्हेंट कसा करायचा, हे भाजपकडून शिकावे, अशी उपरोधिक टिप्पणीही त्यांनी केली. या प्रकरणातून केंद्र सरकार राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत पूर्णपणे सपशेल अपयशी ठरल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.


सम्बन्धित सामग्री