सातारा: फलटणमध्ये महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याने राज्याचे वातावरण तापले आहे. अशातच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फलटण येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांनी डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणावर भाष्य केलं. आमच्या धाकट्या भगिनीने आत्महत्या केली. या प्रकरणातील आरोपींना अटक झाली आहे. जे जे दोषी असतील त्यापैकी कुणालाही सोडणार नाही परंतु राजकारणात सध्या वाईट प्रयोग सुरू आहेत. प्रत्येक गोष्टीत राजकारण घुसवायचे असे निंदनीय प्रयत्न होत आहेत. या प्रकरणात कसलाही संबंध नसताना माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि सचिन पाटील यांची नावे घुसविण्याचा प्रयत्न झाला, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निंबाळकर यांना थेटपणे क्लिनचिट देऊन टाकली. तसेच रणजितसिंह निंबाळकर यांच्या खंबीरपणे पाठीशी उभा असल्याची ग्वाही देखील फडणवीस यांनी दिली.
फलटणमध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटनांच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस आले होते. फलटणच्या एका महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याच्या तिसऱ्याच दिवशी फडणवीस फलटणला आल्याने त्यांच्या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले होते. फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर मृत्यू प्रकरणात माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यावर आरोप होत आहेत. महिला डॉक्टरने एका पत्रात खासदाराच्या पीएने तंदुरुस्ती प्रमाणपत्रासाठी आपल्यावर अनेकवेळा दबाव टाकल्याचा आरोप केला. हाच धागा पकडून रणजितसिंह निंबाळकर यांच्यावर विरोधी पक्षाकडून आरोपांची मालिका सुरु होती. पण या प्रकरणात त्यांचा कोणताही संबंध नसल्याचे खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगून त्यांना एकप्रकारे क्लिनचिट दिली आहे.
हेही वाचा:Ujjwal Nikam On Phaltan Doctor Case: डॉक्टर तरुणीच्या मृत्यू प्रकरणात उज्ज्वल निकमांची प्रतिक्रिया समोर, हातावर लिहून...
फडणवीस म्हणाले, "फलटणमध्ये मी येऊ नये म्हणून प्रयत्न झाले. दोन दिवसांपूर्वी अत्यंत दुर्दैवी घटना घडली. आमच्या धाकट्या डॉक्टर भगिनीने आत्महत्या केली. ज्यांनी तिला आत्महत्या करायला लावली, त्या सगळ्यांची नावे तिने तिच्या हातावर लिहून ठेवली. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात कुणालाही सोडणार नाही. पण राजकारणात वाईट प्रयोग सुरू आहेत. प्रत्येक गोष्टीत राजकारण घुसवायचे असे निंदनीय प्रयत्न होतायेत. काहीही कारण नसताना या प्रकरणात रणजितदादा निंबाळकर, सचिनदादा यांना गोवण्याचा प्रयत्न झाला. महाराष्ट्राला देवाभाऊचा स्वभाव माहिती आहे. थोडी जरी शंका असती तरी मी आजचा कार्यक्रम रद्द केला असता. अशा प्रकरणांवेळी मी पक्ष पाहत नाही, व्यक्ती पाहत नाही, राजकारण पाहत नाही. लहान भगिनीचा विषय तिथे तडजोड करणार नाही."
प्रत्येक गोष्टीत राजकारण कुणी करत असेल तर ते सहन करणाऱ्यांपैकी नाही, त्यांना उत्तर देणाऱ्यांपैकी मी आहे. प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे राजकारण करतात, असे म्हणत विरोधकांवरही फडणवीस यांनी निशाणा साधला.