नवी दिल्ली: 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला त्याच्या भाषेत उत्तर देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबविले. या हल्ल्यामध्ये भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त केले. भारताने केलेल्या हल्ल्यानंतर काही वेळासाठी पाकड्यांची कोंडी झाली असून, पाकिस्तान सातत्याने भारतावर एकापाठोपाठ एक हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, भारताच्या ऑपरेशन सिंदूरचा धसका पाकिस्तानने चांगलाच घेतला असून, त्याचे पडसाद पाकिस्तानच्या संसदेतही उमटत आहेत.
पाकिस्तान येथील माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाचे खासदार शाहिद अहमद यांनी संसदेमध्ये पाकिस्तानचे विद्यमान पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना झापत त्यांच्या सरकारविरोधात रोष व्यक्त करत म्हणाले की, 'आमचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेण्यास घाबरतात. ते घाबरट आहेत'. भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असताना पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या भूमिकेवर त्यांच्याच देशातील नेत्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
हेही वाचा: भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; युद्धासारख्या परिस्थितीत कोणत्या गोष्टींची खबरदारी घ्यावी? जाणून घ्या
टिपू सुलतान यांचे एक वाक्य आठवते:
पाकिस्तानच्या विद्यमान पंतप्रधान शरीफ यांच्यावर टीका करत पीटीआय पक्षाचे खासदार शाहिद अहमद म्हणाले की, 'मला टिपू सुलतान यांचे एक वाक्य आठवते. एका लष्करात सिंह असले आणि त्याच्यासोबत कोल्हे असतील तरी ते सिंहासारखे लढतात. परंतु सिंहाचा सरदार कोल्हा असेल तर ते सिंहासारखे लढू शकत नाहीत. ते युद्धात पराभूत होतात. तुमचे नेतृत्व घाबरणारा असेल तर काहीच करू शकत नाही'.
हेही वाचा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला राज्यातील सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा
खासदार उल-रहमान यांचा पाकच्या पंतप्रधानांना टोला:
पाकिस्तान येथील संसदेत जमियत उलमा इस्लाम पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार फजल उल-रहमान यांनी देखील पाकिस्तानच्या विद्यमान पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना टोला लगावत म्हणाले की, 'देश युद्धाच्या उंबरठ्यावर असून आज संसदेत कोणीही जबाबदार व्यक्ती नाही. म्हणून मी देखील संसदेतून बाहेर पडत आहे'.