Friday, December 05, 2025 02:20:13 AM

Palghar BJP Politics: आधी आरोप मग पक्ष प्रवेश! पालघर साधू हल्ला प्रकरणातील आरोपी भाजपात

या पक्षप्रवेशामुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली असून विरोधकांनी भाजपवर दुहेरी राजकारणाचे आरोप होत आहेत.

palghar bjp politics आधी आरोप मग पक्ष प्रवेश पालघर साधू हल्ला प्रकरणातील आरोपी भाजपात

पालघर जिल्ह्यातील राजकीय वातावरणाला अचानक मोठे वळण मिळाले आहे. 2020 मधील गडचिंचले साधू हत्याकांडात आरोपी म्हणून नाव आलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे स्थानिक नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ चौधरी यांनी तब्बल 4000 पेक्षा जास्त समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे अक्षरशः ढवळून निघाली आहेत. या प्रवेशामुळे भाजपवर विरोधकांकडून जोरदार टिका होत असून या राजकीय हालचालीमुळे अनेक प्रश्न पुन्हा एकदा पुढे येऊ लागले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पालघरमध्ये भाजपने राष्ट्रवादी शरद पवार गटाला अनपेक्षित आणि मोठा धक्का दिला आहे. काशिनाथ चौधरी यांनी पालघर लोकसभेचे भाजप खासदार हेमंत सावरकर आणि भाजप जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. चौधरी यांनी मोठ्या शक्तीप्रदर्शनासह मैदानात उतरत 4000 समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला, ज्यामुळे स्थानिक राजकारणात मोठी समीकरणे बदलली आहेत.

16 एप्रिल 2020 रोजी डहाणूतील गडचिंचले गावात दोन साधू आणि त्यांच्या चालकाची जमावाने मारहाण करून हत्या केली होती. या प्रकरणाने राज्यभरात प्रचंड खळबळ उडवली होती. हत्याकांडानंतर जवळपास 200 जणांना अटक करण्यात आली होती, तर काही आरोपींना न्यायालयीन प्रक्रियेनंतर सशर्त जामीन मिळाला आहे.

हेही वाचा: CNG Shortage in Mumbai : मुंबईत सीएनजी पुरवठा कोलमडला; रिक्षा, टॅक्सी सेवा गडबडली

त्या काळात भाजपने या प्रकरणावर महाविकास आघाडी सरकारला आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जोरदार धारेवर धरले होते. याच भडकलेल्या वातावरणात काशिनाथ चौधरी यांचे नाव मुख्य आरोपींपैकी एक म्हणून समोर आले होते. तेव्हा भाजपनेच त्यांच्यावर हत्याकांडात थेट सहभागाचे आरोप केले होते. मात्र आता तोच चेहरा भाजपमध्ये दाखल झाल्याने पक्षाच्या भूमिकेबाबत आणि नैतिकतेबाबत अनेक प्रश्नचिन्हे उभी राहिली आहेत. स्थानिक पातळीवरही यावर मोठे चर्चावर्तुळ रंगले असून विरोधकांनी या प्रवेशाला “दुहेरी राजकारण” म्हणत टीका सुरू केली आहे.

या पक्षप्रवेशामुळे पालघरच्या राजकीय पटावर मोठी उलथापालथ झाली आहे. चौधरी यांच्या सामील होण्यामागील गणित काय? भाजपने नेमके कोणत्या उद्देशाने हा प्रमुख चेहरा संघटनेत घेतला? आणि साधू हत्याकांडाचा वाद पुन्हा पेटणार का? या सर्व प्रश्नांमुळे पालघर जिल्हा पुन्हा एकदा राजकीय सस्पेन्समध्ये आहे.

हेही वाचा:  Amit Thackeray : निवडणुकीच्या तोंडावर अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल! छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ठरले कारण

 

सम्बन्धित सामग्री