Rohit Pawar On Parth Pawar: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने पवार कुटुंबातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेस पक्षाच्या भूमिकेवर 'डाऊनफॉल' अशी टीका करणाऱ्या पार्थ पवार यांना आमदार रोहित पवार यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. "कुठलाही राजकीय पक्ष कधीच संपत नसतो, सत्तेत असताना जमिनीवर पाय असणे गरजेचे आहे," अशा बोचऱ्या शब्दांत रोहित पवारांनी पार्थ यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. या विधानामुळे राजकीय वर्तुळात आता 'दादां'चे सुपुत्र विरुद्ध 'साहेबां'चा नातू असा सामना रंगल्याचे चित्र दिसत आहे.
काँग्रेसच्या उमेदवारीमुळे पार्थ पवार संतापले
बारामतीची जागा बिनविरोध करण्यासाठी महायुतीने सुरुवातीपासून प्रयत्न केले होते. मात्र, काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी देऊन ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. यावर संतप्त प्रतिक्रिया देताना पार्थ पवार यांनी "काँग्रेसचा महाराष्ट्रात आता डाऊनफॉल (अधोगती) सुरू झाला आहे आणि त्यांना याची किंमत मोजावी लागेल," असे विधान केले होते. पार्थ यांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, त्यांच्या राजकीय परिपक्वतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
पक्ष कधीच संपत नाही; रोहित पवारांचा टोला
पार्थ पवार यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना रोहित पवार यांनी त्यांना वास्तवाची जाणीव करून दिली. रोहित पवार म्हणाले की, "कोणताही पक्ष आपापल्या ताकदीनिशी मैदानात असतो. त्यामुळे दुसरा पक्ष संपला आहे असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. तुम्ही सत्तेत असा किंवा विरोधात, जमिनीवर राहूनच राजकारण करावे लागते. पार्थने हे विधान खूप घाईगडबडीत केले आहे." तसेच, "उद्या पार्थ कदाचित म्हणेल की माझ्या विधानाचा विपर्यास झाला, पण वास्तव हेच आहे की त्याचे ते बोलणे अयोग्य होते," असेही त्यांनी ठामपणे नमूद केले.
हेही वाचा - Supriya Sule: काँग्रेस-पार्थ पवार वादावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, 'लोकशाही मार्गाने आपला उमेदवार...'
पवार कुटुंबियांनीही फिरवली पाठ
विशेष म्हणजे, पार्थ पवार यांच्या या विधानावर शरद पवार यांनी केवळ स्मितहास्य करत सूचक मौन पाळले, तर सुप्रिया सुळे यांनीही त्यांची भूमिका अयोग्य असल्याचे स्पष्ट केले होते. आता रोहित पवारांच्या सल्ल्यामुळे पार्थ पवार या मुद्द्यावर एकाकी पडल्याचे दिसत आहे. दरम्यान, अजित पवार, सुनेत्रा पवार किंवा छगन भुजबळ हे काँग्रेस नेत्यांशी चर्चा करून यातून काही सकारात्मक मार्ग काढतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.