मुंबई: शनिवारी, शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसेंनी पत्रकारपरिषद घेतली होती. मात्र, पावसाळी अधिवेशन सुरू होण्याच्या काही दिवसांपूर्वीच रोहिणी खडसेंनी महायुती सरकारवर निशाणा साधला. यावेळी त्या म्हणाल्या, 'सरकारने जनतेला केवळ आश्वासनांचं गाजर दाखवलं आहे'. यादरम्यान, रोहिणी खडसेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना गाजराचा हार घालत, 'महायुतीनं महाराष्ट्राला गाजर दाखवलंय', अशी टीका केली. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
काय म्हणाल्या रोहिणी खडसे?
'महायुती सरकारने महाराष्ट्राच्या जनतेला आजवर फक्त गाजरांची खैरात देण्याचं काम केलं आहे. त्यांनी दिलेल्या आश्वासनांचा त्यांना विसर पडला आहे. आम्ही हे आश्वासन दिलच नव्हतं, आम्ही हे सांगितलच नव्हतं', असं वक्तव्य रोहिणी खडसेंनी केलं. 'महाराष्ट्राच्या जनतेला जी गाजरं यांनी दिली त्याच गाजरांनी त्यांचा सत्कार करत आहोत', अशी टीका खडसेंनी महायुतीवर केली.
हेही वाचा: मोहल्ला कमिटी बैठकीत सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक
चित्रा वाघांचा खडसेंवर हल्लाबोल:
नुकताच, भाजपच्या नेत्या चित्रा वाघांनी 'एक्स'वर पोस्ट करत रोहिणी खडसेंना प्रत्युत्तर दिलं की, 'तुतारीची झाली पुंगी..आणि त्यांच्या तडतड वाजंत्र्यांच्या बाताच ढोंगी…गाजरांचा हार घालून सरकारची थट्टा करणाऱ्यांनी आधी स्वतःचा ‘काळा इतिहास’ बघावा! लोकसभा निवडणुकीत 8 हजार रुपयांची गाजरं दाखवणारे हे आज आमच्या नेत्यांना गाजराचे हार घालत आहेत? लक्षात ठेवा हे सरकार आश्वासनं देत नाही तर प्रत्यक्ष काम करतं! आणि हो – ‘गाजरांचा हार’ घालणाऱ्यांनी लक्षात घ्यावं, जनता आता गाजर दाखवणाऱ्यांवर नाही, गाजर उगवणाऱ्या शेतकऱ्याच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणाऱ्यांवर विश्वास ठेवते! तुतारीच्या वाजंत्र्यांनी हे लक्षात घ्यावं'.