दिल्ली येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शताब्दी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित राहून संघाच्या कार्यपद्धती आणि योगदानाबाबत महत्त्वपूर्ण विचार मांडले. पंतप्रधानांनी संघाच्या शताब्दी सोहळ्याबद्दल स्वयंसेवकांचे अभिनंदन केले तसेच त्यांच्या समाजाभिमुख कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, "संघावर पूर्वी अनेक हल्ले झाले, त्याला संपवण्याचे प्रयत्न झाले, संघाविरुद्ध साजिश रचली गेली आणि मुख्य प्रवाहात येण्यापासून अडथळे निर्माण करण्यात आले. तरीही संघाने राष्ट्र प्रथम या तत्त्वावर कधीही तडजोड केली नाही." त्यांनी अधोरेखित केले की संघाच्या शाखा ही प्रेरणास्थळे आहेत जिथे शारीरिक, मानसिक आणि वैचारिक विकास घडवला जातो.
या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी संघाच्या विविध योगदानांचा उल्लेख करताना सांगितले की, संघाने स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वपूर्ण सहभाग नोंदवला, अत्याचार सोसले, बलिदाने दिली, पण देशासाठी सदैव कार्यरत राहिले. संघाचे ध्येय नेहमीच "एक भारत, श्रेष्ठ भारत" हे राहिले आहे. त्यांनी सांगितले की संघावर अनेकदा बंदी घालण्यात आली, खोटे खटले दाखल झाले, तरीही संघाने कधीही कटुता निर्माण केली नाही.
यावेळी पंतप्रधान मोदींनी 100 रुपयांचे स्मारक नाणे आणि विशेष टपाल तिकीट जारी केले. त्यांनी सांगितले की, "हे तिकीट 1963 च्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी झालेल्या स्वयंसेवकांच्या त्याग आणि योगदानाला अभिवादन आहे." पंतप्रधानांच्या मते, संघाने नेहमीच राष्ट्रनिर्मितीवर भर दिला असून समाजातील प्रत्येक घटकाला एकत्र घेऊन काम केले आहे.
पंतप्रधानांनी असेही म्हटले की संघाच्या विविध शाखांमध्ये कधीही अंतर्विरोध होत नाही कारण त्या सर्व शाखा राष्ट्र प्रथम या मूलमंत्रावर कार्य करतात. त्यांनी आवर्जून सांगितले की RSS हे केवळ एक संघटन नसून राष्ट्राच्या उभारणीसाठी, समाजाला सक्षम करण्यासाठी आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी कार्यरत एक चळवळ आहे.