मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीत मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील धक्कादायक फोटो समोर आल्यानंतर राज्यभरात संताप व्यक्त होत आहे. मराठा समाजाने या प्रकरणाविरोधात बीड जिल्हा बंदची हाक दिली असून, व्यापारीही या आंदोलनात सहभागी होत आहेत.
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय: राजकीय वर्तुळात मोठ्या उलथापालथी होत असून, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत वेगाने हालचाली सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंना राजीनामा देण्यास सांगितल्याची माहिती समोर आली आहे. प्रारंभीपासूनच मुख्यमंत्री फडणवीस यांचा यावर आग्रह होता, मात्र धनंजय मुंडे तयार नव्हते. अखेर काल झालेल्या देवगिरीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी त्यांना तातडीने राजीनामा द्यावा असे स्पष्टपणे सांगितले.
संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि बीड बंद: बीड जिल्ह्यात सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे फोटो समोर आल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण बीड जिल्हा बंद करण्यात आला आहे. शहरातील प्रमुख मार्केटसह सुभाष रोडवरील दुकाने बंद राहिली असून, व्यापारी उस्फूर्तपणे या बंदमध्ये सहभागी झाले आहेत.
संतोष देशमुख यांची अमानुषपणे हत्या करण्यात आल्याचे समोर आले असून, त्यांच्या कुटुंबीयांसह संपूर्ण मराठा समाजाने या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे. या घटनेमुळे धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढल्या असून, त्यांच्यावर राजकीय आणि सामाजिक दबाव निर्माण झाला आहे.
देवगिरीवर महत्त्वाची बैठक: धनंजय मुंडेंच्या राजकीय भवितव्यावर अंतिम निर्णय घेण्यासाठी काल रात्री उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत देवगिरी बंगल्यावर तातडीची बैठक झाली. सुमारे दीड तास चाललेल्या या चर्चेत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते.
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे वादळ उठण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी नवीन मंत्र्याची नियुक्ती कधी होणार, याकडेही लक्ष लागले आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रातील सत्तासमीकरणांवरही परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आज राजीनामा?
संपूर्ण राज्याचे लक्ष आता धनंजय मुंडेंच्या आजच्या निर्णयाकडे लागले आहे. राजकीय वातावरण तापले असताना मुंडे आज राजीनामा देतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.