मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर सत्तास्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून महापौर पद अडीच-अडीच वर्ष वाटून देण्यात यावे, अशी ठाम इच्छा शिवसेनेच्या नगरसेवक व नेत्यांकडून व्यक्त होत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेनेचाच महापौर बसावा, अशी भूमिका शिंदे गटाने घेतली आहे. या मुद्द्यावर भाजप व शिवसेनेच्या नेत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांना सुरक्षित ठेवण्यासाठी ‘हॉटेल पॉलिटिक्स’चा आधार घेतला असून, सर्व विजयी नगरसेवकांना वांद्रे येथील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये हलवण्यात येत आहे. अखेर या सत्तासमीकरणावर भाजपचे पक्षश्रेष्ठ कोणता निर्णय घेतात, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.