मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजपवर सडकून टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले की, 'ही निवडणूक घाणेरड्या पद्धतीने सत्ताधाऱ्यांनी लढवली. त्यांनी साम दाम दंड भेद सगळ्याचा वापर केला. शिवसैनिकांना तडीपार केलं, काही ठिकाणी दंगली घडवल्या, पैशांचं आमिष दिलं, जोरजबरदस्तीनं उमेदवारी मागे घ्यायला लावली, याला न घाबरता काही शिलेदारांनी निवडणूक लढवली आणि जिंकली, त्यांचं कौतुक आहे. मुंबईत आमचा महापौर व्हावा, ही इच्छा आजही आहे. आतातरी ते शक्य नाही. पण त्यांच्या खेळाला आम्ही उत्तर देऊ. निवडणूक जिंकण्याचा एकही प्रयत्न त्यांनी सोडला नाही. विधानसभा, लोकसभा खुर्च्या रिकाम्या होत्या. यावेळी राजसोबत मी शिवाजी पार्कवर भाषण केलं. त्यावेळी लोकांची गर्दी होती. खुर्च्यांच्या गर्दीचं मतदानाच रुपांतर मात्र झालं नाही. या उलट त्यांच्याकडे खुर्च्या रिकाम्या होत्या, परंतू निवडणूक जिंकले. म्हणजे रिकाम्या खुर्च्या मतदान करतात, हे न सुटणारं कोडं आहे. गेले 4 वर्ष भाजप पैसा पेरतं होते. चार वर्ष त्यांनी त्यांच्या नगरसेवकांना अमाप पैसा वाटला. हा पैसा येतो कुठून, यामागे ईडी कशी लागत नाही. 2015 ला काळा पैसा नाहीसा व्हावा म्हणून नोटबंदी झाली, ती सिस्टम आता बंद पडली का, याचं उत्तर शोधावं लागेल. थोडक्यात शिवसेना कागदावर संपली, जमिनीवर नाही. भाजप कागदावरती आहे. मात्र जमिनीवर तिचं अस्तित्व नाही. जे निवडणून आले ते साधे आहेत. प्रचंड ताकदीसमोर आमचे निष्ठावान लढले आणि जिंकले. आमचं काम सर्वांसमोर आहेच. मुंबईकर आम्हाला भरभरून आशीर्वाद देतील, असं वाटलं होतं. ते दिलं नसलं तरी शिवसेनेच्या गडावर (सेनाभवनावर) आशीर्वादाचा हात तसाच ठेवला आहे. आमचे शिवसैनिक, मनसे आणि शरद पवार गटाची राष्ट्रवादी एकत्रितरित्या महापालिकेत काम करतील. वचननाम्यात दिलेलं काम सत्यात उतरवू. हे लोकप्रतिनिधी त्यांच्या कामावरही लक्ष ठेवतील. आम्ही हरलो ही आमची मानसिकता नाही. ज्या पद्धतीने ते लढले त्याला तोडीसतोड उत्तर आम्ही दिलं आहे. त्यांनी जी माणसं फोडली ते टिकवणं कठिण आहे, हे आव्हान त्यांच्यासमोर आहे.'