Abhishek Sharma: टी-20 विश्वचषक 2026 मध्ये भारतीय संघाची कामगिरी चर्चेत असतानाच, सलामीवीर अभिषेक शर्माबाबत एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. मैदानातील खराब फॉर्ममागे अभिषेकची 'गंभीर दुखापत' कारणीभूत असल्याचे बोलले जात असून, टीम मॅनेजमेंटने ही बाब दडवून ठेवल्याचा दावा केला जात आहे.
हाताला टाके, तरीही मैदानात
प्राप्त माहितीनुसार, विश्वचषक सुरू होण्यापूर्वीच एका फोटोशूट दरम्यान अभिषेकच्या हाताला गंभीर जखम झाली होती. ही दुखापत इतकी खोल होती की त्याच्या हातावर टाके घालावे लागले होते. मात्र, इतकी मोठी रिस्क असतानाही मॅनेजमेंटने त्याला खेळवण्याचा निर्णय घेतला. USA विरुद्धच्या सामन्यात तो जखमी हातानेच फलंदाजीला उतरला आणि शून्यावर बाद झाला. आता चाहत्यांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत की, खेळाडूच्या फिटनेसबद्दल इतकी गोपनीयता का पाळली गेली?
पोटदुखी की दुखापत? मॅनेजमेंटच्या दाव्यावर संशय
अभिषेकच्या अनुपस्थितीबाबत यापूर्वी वेगळीच कारणे देण्यात आली होती. नामियाबिया विरुद्धच्या सामन्यावेळी तो 'पोटात इन्फेक्शन' असल्यामुळे खेळला नसल्याचे सांगण्यात आले होते. USA विरुद्धच्या सामन्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले होते, तेव्हाही 'पोटदुखी' हेच कारण पुढे करण्यात आले. आता समोर आलेल्या नवीन दाव्यांनुसार, त्याच्या हाताची दुखापत हेच त्याच्या खराब फॉर्मचे मुख्य कारण असल्याचे समजते. पाकिस्तानविरुद्ध त्याने पुनरागमन केले, पण तो पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याचे त्याच्या फलंदाजीवरून स्पष्ट जाणवत होते.
4 सामन्यात अवघ्या 15 धावा
अभिषेक शर्मासाठी हा विश्वचषक आतापर्यंत अत्यंत निराशाजनक ठरला आहे. त्याची कामगिरी खालीलप्रमाणे राहिली आहे:
एकूण सामने: 4
एकूण धावा: 15 (यातील सर्व धावा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या गेल्या सामन्यात केल्या).
इतर सामने: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या खेळीपूर्वी तो सलग तीन सामन्यांत शून्यावर बाद झाला होता.
हेही वाचा - IND vs SA: संजू सॅमसनचं होणार पुनरागमन? अभिषेक-तिलकच्या फ्लॉप शोनंतर प्रशिक्षकांच्या विधानाने खळबळ
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताला पराभव स्वीकारावा लागल्याने संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. अशातच फॉर्मात नसलेल्या आणि जखमी अभिषेक शर्माला संघात कायम ठेवून टीम इंडियाने मोठी चूक केली का? अशी चर्चा आता क्रीडावर्तुळात रंगली आहे.