IPL 2026: इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 19 व्या हंगामातील 54 वा साखळी सामना 10 मे रोजी रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील हा सामना अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जात आहे. या हाय-व्होल्टेज सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या गोटातून एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. संघाचा हुकुमी एक्का सूर्यकुमार यादव या सामन्यासाठी उपलब्ध असणार आहे.
कौटुंबिक कारणास्तव घेतला होता ब्रेक
भारतीय T20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याच्या घरी नुकतेच एका चिमुकल्या परीचे आगमन झाले आहे. आपल्या पत्नीने मुलीला जन्म दिल्यानंतर सूर्या काही दिवसांसाठी घरी परतला होता. 4 मे रोजी लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यानंतर त्याने संघाचा निरोप घेतल्याने, तो RCB विरुद्ध खेळणार की नाही, याबाबत साशंकता होती. मात्र, 'Cricbuzz' च्या वृत्तानुसार, सूर्याने आपण उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले असून तो लवकरच रायपूरमध्ये संघाशी जोडला जाणार आहे.
कर्णधार हार्दिकच्या उपलब्धतेबाबत अद्यापही सस्पेन्स
सूर्या परतणार असला तरी, मुंबईचा नियमित कर्णधार हार्दिक पांड्या याच्या खेळण्याबाबत अद्याप प्रश्नचिन्ह कायम आहे. हार्दिक सध्या पाठीच्या स्नायूंच्या दुखापतीशी (back strain) झुंज देत आहे. त्याच्या तंदुरुस्तीचा अहवाल संघाचे 'क्रीडा वैद्यकीय प्रमुख' बेन लँगली आणि फिजिओ नितीन पटेल यांच्याकडून येणे बाकी आहे. 8 मे रोजी त्याची पहिली फिटनेस टेस्ट झाली असून, 9 मे रोजी होणाऱ्या अंतिम चाचणीनंतरच तो सरावात सहभागी होणार की नाही, याचा निर्णय घेतला जाईल.
प्लेऑफच्या शर्यतीत टिकण्यासाठी विजयाची गरज
मुंबई इंडियन्ससाठी हा हंगाम अत्यंत आव्हानात्मक ठरला आहे. आतापर्यंत खेळलेल्या 10 सामन्यांपैकी मुंबईला केवळ 3 विजय मिळवता आले आहेत, तर 7 सामन्यांत त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. प्लेऑफच्या शर्यतीत तांत्रिकदृष्ट्या टिकून राहण्यासाठी मुंबईला त्यांचे उर्वरित सर्व सामने जिंकणे अनिवार्य आहे. अशा कठीण प्रसंगी सूर्यकुमार यादवचे संघात परतणे मुंबई इंडियन्ससाठी मोठे नैतिक बळ ठरणार आहे. विशेष म्हणजे, गेल्या सामन्यात हार्दिकच्या अनुपस्थितीत सूर्यानेच कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती.
हेही वाचा - Rohit Sharma Fan Moment : रोहितला पाहताच ती किंचाळली, सेल्फीसाठी धावत आली, पण फोन...; पाहा काय म्हणाला रोहित शर्मा, मजेशीर व्हिडीओ व्हायरल
आजच्या सराव सत्राकडे सर्वांचे लक्ष
आज, 9 मे रोजी संध्याकाळी होणाऱ्या सराव सत्रात हार्दिक पांड्या सहभागी होतो का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. जर हार्दिक तंदुरुस्त नसेल, तर पुन्हा एकदा सूर्यकुमार यादवच संघाचे नेतृत्व करताना दिसू शकतो. RCB आणि मुंबई या दोन्ही संघांमध्ये स्टार खेळाडूंची मोठी फळी असल्याने रविवारी रायपूरमध्ये क्रिकेटचा मोठा थरार पाहायला मिळेल यात शंका नाही.