IND vs AUS 1st T20: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेला कॅनबेरामध्ये रंगतदार सुरुवात होण्याची अपेक्षा होती. मात्र, पावसाने खेळाचा रोमहर्षक क्षण हिरावून घेतला. नाणेफेक जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाने भारताला फलंदाजीस आमंत्रित केले, आणि टीम इंडियाने पावसाआधी दमदार कामगिरी केली.
भारताने 9.4 षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात 97 धावा केल्या होत्या. कर्णधार सूर्यकुमार यादव आणि उपकर्णधार शुभमन गिल या दोघांनीही जबरदस्त फलंदाजी करत संघाला मजबूत स्थितीत नेले. सूर्यकुमारने 24 चेंडूत 39 धावा केल्या, त्यात 3 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. तर गिलने 20 चेंडूत 37 नाबाद धावा करत आपली कामगिरी कायम ठेवली.
हेही वाचा - Rohit Sharma: हिटमॅनचा धमाका! रोहित शर्मा जगात नंबर 1; सचिन, धोनी आणि विराटला मागे टाकत रचला नवा इतिहास
अभिषेक शर्मानेही आपली आक्रमक शैली कायम ठेवत 14 चेंडूत 19 धावा केल्या. तो 19 वर बाद झाला, परंतु त्याच्या आक्रमक सुरुवातीने भारताचा वेग वाढवला. पहिल्या विकेटसाठी अभिषेक आणि शुभमनने 35 धावांची भागीदारी केली, त्यानंतर शुभमन आणि सूर्याने दुसऱ्या विकेटसाठी 62 धावांची अर्धशतकी भागीदारी करत भारतीय डावाला स्थैर्य दिले.
हेही वाचा - Shreyas Iyer Health Update : "श्रेयस माझ्यासोबत फोनवर बोलला, त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे." सूर्यकुमार यादवने दिली अय्यरच्या तब्बेतीची माहिती
ऑस्ट्रेलियाच्या बाजूने नाथन एलिस हा एकमेव गोलंदाज ठरला ज्याने विकेट घेतली. त्याने 1.4 षटकांत 25 धावा देत अभिषेक शर्मा याला बाद केले. पावसामुळे दोन वेळा खेळात व्यत्यय आला आणि अखेर सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता मालिकेतील दुसरा सामना 31 ऑक्टोबर रोजी मेलबर्नमध्ये खेळवला जाणार आहे, जिथे टीम इंडिया पुन्हा दमदार पुनरागमन करण्यास सज्ज असेल.