आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यातील भारत-पाकिस्तान सामना सर्वात मोठा आणि सर्वात रोमांचक मानला जातो. मात्र सध्या सुरु असलेल्या टी-20 विश्वचषकातील भारत-पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामन्याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाला होता. मात्र टी-20 विश्वचषकातील भारत-पाकिस्तान यांच्यातील गट सामना आता खेळवला जाणार आहे. हा सामना आता 15 फेब्रुवारी रोजी कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर वेळापत्रकानुसार होईल. बांगलादेशच्या स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या वादावरून पाकिस्तानने देखील भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकत सामना खेळण्यास नकार दिला होता. एवढचं नव्हे तर जर भारताने पाकिस्तान आणि बांगलादेशसोबतच्या 'त्रिकोणी मालिकेत' सहभागी होण्यास मान्यता दिली, तरच पाकिस्तान संघ विश्वचषकात भारताविरुद्ध खेळेल, अशी अट पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने घातली होती. मात्र पाकिस्तानच्या या मागणीला आयसीसीने त्यापैकी एकही स्वीकारलेली नाही.
हेही वाचा- India vs Pakistan : पाकिस्तानची टीम इंडियासमोर नवीन अट; 'हा' करार झाला तरच रंगणार महामुकाबला
दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे प्रतिनिधी इम्रान ख्वाजा आणि मुबाशिर उस्मानी नुकतेच लाहोरला आले होते. त्यावेळेस त्यांनी पीसीबी अधिकाऱ्यांसोबत दीर्घ चर्चा केली. त्यावेळेस या बैठकीत बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष अमिनुल इस्लाम बुलबुल देखील उपस्थित होते. या चर्चेत भारत-पाकिस्तान सामन्यावर बहिष्कार टाकण्याबाबत आयसीसीने पाकिस्तानला संभाव्य आर्थिक दंड आणि इतर कठोर निर्णयांबद्दल माहिती दिली. आयसीसीसोबतच्या दीर्घ चर्चेनंतर, पाकिस्तानने आपला निर्णय मागे घेतला आहे.
यासंदर्भात पाकिस्तान सरकारने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये त्यांचा संघ भारताविरुद्ध सामना खेळणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे की, "अनेक चर्चेच्या निकालानंतर तसेच मित्र देशांच्या आवाहनानंतर, पाकिस्तान सरकार पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघाला 15 फेब्रुवारी 2026 रोजी नियोजित वेळापत्रकानुसार आयसीसी टी20 विश्वचषकात मैदानात उतरण्याचे निर्देश देत आहे. क्रिकेटच्या भावनेचे रक्षण करण्यासाठी आणि सर्व सहभागी देशांमध्ये या जागतिक खेळाच्या सातत्य राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे."
हेही वाचा- India Pakistan Match: दहशतवाद की क्रिकेट? पाकिस्तानचा 'ब्लॅकमेल' प्लॅन; भारताशी सामना खेळण्यासाठी मांडल्या अजब अटी
यावेळेस स्वत: बांगलादेशनेही पाकिस्तानला सामना खेळण्याचे आवाहन केले. आयसीसीसोबतच श्रीलंका क्रिकेट, एमिरेट्स क्रिकेट बोर्ड आणि बांगलादेश क्रिकेट बोर्ड या तीन क्रिकेट बोर्डांनीही पाकिस्तानला भारताविरुद्ध सामना खेळवण्याचे आवाहन केले. तसेच दुसरीकडे बांगलादेश क्रिकेट बोर्डाला निश्चितच काही दिलासा मिळाला आहे आणि त्यांना कोणतेही नुकसान सहन करावे लागणार नाही.