Wednesday, April 22, 2026 11:12:20 PM

IPL 2026: IPL मध्ये 2400 कोटींचा तोटा? ललित मोदींचा मोठा दावा; धक्कादायक कारण समोर, BCCI चं नियोजन...

आयपीएलमध्ये सामने कमी खेळवल्यामुळे बीसीसीआयला मोठ्या आर्थिक तोट्याला सामोरे जावे लागत असल्याचा दावा ललित मोदी यांनी केला असून त्यांच्या वक्तव्यामुळे क्रिकेट वर्तुळात चर्चा रंगली आहे

ipl 2026 ipl मध्ये 2400 कोटींचा तोटा ललित मोदींचा मोठा दावा धक्कादायक कारण समोर bcci चं नियोजन

IPL 2026: इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल ही जगातील सर्वात श्रीमंत आणि लोकप्रिय क्रिकेट लीग मानली जाते. मात्र, या लीगबाबत एक धक्कादायक दावा समोर आला आहे. आयपीएलचे संस्थापक ललित मोदी यांनी सध्याच्या फॉरमॅटवर प्रश्न उपस्थित करत मोठा आर्थिक तोटा होत असल्याचा आरोप केला आहे.

ललित मोदी यांच्या मते, सध्याच्या स्पर्धेत अपेक्षित तितके सामने खेळवले जात नसल्यामुळे बीसीसीआयला मोठ्या प्रमाणावर महसुलाचे नुकसान सहन करावे लागत आहे. त्यांनी स्पष्ट केले की, आयपीएलमध्ये प्रत्येक संघाने इतर सर्व संघांविरुद्ध घरच्या आणि बाहेरच्या मैदानावर सामने खेळणे अपेक्षित असते. मात्र, प्रत्यक्षात असे होत नसल्यामुळे अनेक सामने कमी होत आहेत.

हेही वाचा: KKR vs PBKS IPL 2026: ईडन गार्डन्सवर पावसाचा खेळ; कोलकाता-पंजाब सामन्यात व्यत्यय; सामना पुन्हा कधी सुरू होणार? वाचा

आयपीएलमध्ये सध्या 10 संघ सहभागी आहेत. या संघांमध्ये पूर्ण ‘होम अँड अवे’ फॉरमॅटनुसार सामने खेळवले गेले असते, तर लीग टप्प्यातील सामन्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली असती. त्यानंतर प्लेऑफचे सामने धरून एकूण सुमारे 94 सामने होऊ शकले असते. परंतु सध्या फक्त 74 सामने खेळवले जात आहेत. यामुळे जवळपास 20 सामन्यांचा तोटा होत असल्याचे मोदी यांनी सांगितले.

या अतिरिक्त सामन्यांमुळे मीडिया राइट्स आणि स्पॉन्सरशिपमधून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळू शकले असते. मोदी यांच्या गणितानुसार, प्रत्येक सामन्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या आधारावर सुमारे 2400 कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळू शकला असता. हा पैसा केवळ बीसीसीआयसाठीच नव्हे, तर सर्व फ्रँचायझींसाठीही फायद्याचा ठरला असता.

हेही वाचा: Arjun Tendulkar Carrying Drinks : मास्टरब्लास्टरचा मुलगा शेवटी मेहनतच निवडणार; अर्जुनच्या 'त्या' कृतीने जिंकली अनेकांची मनं

याशिवाय, या उत्पन्नातील काही हिस्सा संघांना मिळाला असता, ज्यामुळे प्रत्येक टीमची आर्थिक ताकद वाढली असती. त्यामुळे खेळाडूंची गुणवत्ता, सुविधांमध्ये सुधारणा आणि स्पर्धेची पातळी अधिक उंचावली गेली असती, असेही मोदी यांनी स्पष्ट केले.

ललित मोदी यांनी बीसीसीआयच्या सध्याच्या नियोजनावरही टीका केली आहे. त्यांच्या मते, जर वेळापत्रकात जागा नसेल तर संघांची संख्या वाढवण्याचा निर्णय चुकीचा ठरतो. स्पर्धेची खरी मजा आणि आर्थिक मूल्य ‘होम अँड अवे’ या पद्धतीतच दडलेले आहे, असे त्यांनी सांगितले.

या वक्तव्यानंतर क्रिकेट वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. आयपीएलसारख्या मोठ्या लीगमध्ये खरंच एवढा तोटा होत आहे का, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. बीसीसीआयकडून यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

 


सम्बन्धित सामग्री