Maharashtra Govt Honors Women Cricketers: महिला क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघातील महाराष्ट्राच्या तीन स्टार खेळाडूंचा राज्य सरकारकडून भव्य सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत झालेल्या विशेष समारंभात स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज आणि राधा यादव यांना एकूण 2.25 कोटी रुपयांचा रोख पुरस्कार जाहीर करत त्यांचा गौरव केला. दक्षिण मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानी झालेल्या या सोहळ्यात फडणवीस म्हणाले, 'भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवून प्रत्येक भारतीय तरुणीला प्रेरणा दिली आहे. आज या खेळाडूंमुळे महाराष्ट्र आणि भारताचा अभिमान उंचावला आहे.'
मुख्यमंत्र्यांनी संघ प्रशिक्षक अमोल मजुमदार यांना 22.5 लाखांचे पारितोषिक दिले, तर सपोर्ट स्टाफमधील प्रत्येक सदस्याला 11 लाख रुपये देण्यात आले. या वेळी गोलंदाजी प्रशिक्षक अविष्कर साळवी, माजी क्रिकेटपटू डायना एडुलजी, विश्लेषक अनिरुद्ध देशपांडे, लॉजिस्टिक्स समन्वयक अपर्णा गंभीरराव आणि सपोर्ट स्टाफचे सदस्य मिहिर उपाध्याय, पूर्वा काटे आणि ममता शिरुरल्ला उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी यावेळी बीसीसीआय सचिव आणि आयसीसी अध्यक्ष जय शाह यांच्या योगदानाचेही विशेष कौतुक केले.
हेही वाचा - IND vs PAK Hong Kong Sixes: भारताचा पाकिस्तानवर पुन्हा विजय! दोन धावांनी जिंकला हाँगकाँग सिक्सेस सामना
दरम्यान, उपकर्णधारी स्मृती मानधना म्हणाली, मुंबईत सन्मान मिळणे आमच्यासाठी भावनिक क्षण आहे. महाराष्ट्राने आमचा नेहमीच सन्मान केला आहे. 2017 मध्ये आम्ही उपविजेते झालो तेव्हाही राज्याने आमचं कौतुक केलं होतं. हा विजय कोचिंग स्टाफ आणि टीमच्या अखंड मेहनतीचं फलित आहे. तथापी, राधा यादवने म्हटलं की, अशा प्रकारचा सन्मान मला पहिल्यांदाच मिळाला आहे. हा माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे.
हेही वाचा - Pratika Rawal: जय शाह यांचा हस्तक्षेप निर्णायक; प्रतीका रावलला मिळालं तिचं हक्काचं विश्वचषक मेडल
याशिवाय, जेमिमा रॉड्रिग्जने म्हटलं की, आमचं पुढचं ध्येय पुढील पिढीसाठी भारतीय महिला क्रिकेटला आणखी उंचीवर नेणं हे आहे. प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांनी सांगितले, 'मुंबईत परतल्यावर संघाला विश्वास होता की काहीतरी ऐतिहासिक घडणार आहे. मुलींनी खरोखरच दिवस-रात्र मेहनत घेतली आणि त्यांचं स्वप्न पूर्ण केलं.'