India vs Australia 5th T20I: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा आणि शेवटचा टी-20 सामना ब्रिस्बेनच्या गॅबा मैदानावर पावसामुळे रद्द करण्यात आला. या निकालामुळे भारताने पाच सामन्यांची मालिका 2-1 अशा फरकाने आपल्या नावावर केली. निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते.
खेळ सुरू असताना भारताने 4.5 षटकांत विनाविलंब 52 धावा केल्या होत्या. उपकर्णधार शुभमन गिल 29 आणि सलामीवीर अभिषेक शर्मा 23 धावांवर खेळत होते. गिलने 16 चेंडूत सहा चौकार ठोकले, तर अभिषेकने 13 चेंडूत एक चौकार आणि एक षटकार लगावला. मात्र, सततच्या पावसामुळे खेळ थांबवावा लागला आणि अखेरीस सामना रद्द करण्यात आला.
हेही वाचा - Abhishek Sharma World Record: अभिषेक शर्माचा विश्वविक्रम! 1000 धावांचा टप्पा गाठत बनला जगातील सर्वात जलद फलंदाज
अभिषेक शर्माचा नवा विक्रम
अभिषेक शर्मा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 1000 धावा पूर्ण करणारा भारतीय ठरला आहे. त्याने 528 चेंडूंत हा टप्पा पार करत कर्णधार सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला. सूर्यकुमारने 573 चेंडूंत 1000 धावा पूर्ण केल्या होत्या. इंग्लंडचा फिल साल्ट 599 चेंडूंनंतर 1000 धावांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
हेही वाचा - Mohammed Shami : मोहम्मद शमीच्या बायकोने केली अधिक पोटगीची मागणी, न्यायालयाने फटकारलं, म्हणाले, 'चार लाख कमी आहेत...?'
भारताची दमदार कामगिरी
ऑस्ट्रेलियाने दुसरा टी-20 सामना 4 विकेट्सने जिंकत मालिकेत बरोबरी साधली होती. भारत त्या सामन्यात केवळ 125 धावांवर आटोपला होता. मात्र, त्यानंतर भारताने तिसरा सामना 9 चेंडू शिल्लक असताना 5 विकेट्सने जिंकला आणि चौथ्या सामन्यात 48 धावांनी विजय मिळवला. या दोन सलग विजयांमुळे टीम इंडियाने मालिकेवर 2-1 अशी शिक्कामोर्तब केली.