Monday, May 11, 2026 10:51:51 AM

Vaibhav Suryavanshi: सामना हरल्यानंतर वैभव सूर्यवंशीला अश्रू अनावर; KKR च्या खेळाडूने सावरलं, हृदयस्पर्शी व्हिडीओ व्हायरल

कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धचा सामना शेवटच्या षटकात हातातून निसटल्यानंतर वैभवला आपले अश्रू अनावर झाले आणि तो भर मैदानावरच रडू लागला.

vaibhav suryavanshi सामना हरल्यानंतर वैभव सूर्यवंशीला अश्रू अनावर kkr च्या खेळाडूने सावरलं हृदयस्पर्शी व्हिडीओ व्हायरल

Vaibhav Suryavanshi Crying Video: आयपीएल 2026 (IPL 2026) मधील राजस्थान रॉयल्स (RR) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यातील सामना अत्यंत अटीतटीचा झाला. मात्र, या सामन्यानंतर राजस्थानचा 15 वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याचा एक भावूक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धचा सामना शेवटच्या षटकात हातातून निसटल्यानंतर वैभवला आपले अश्रू अनावर झाले आणि तो भर मैदानावरच रडू लागला.

मैदानावरच रडू लागला
व्हायरल होत असलेल्या 16 सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये 3 क्रमांकाची जर्सी परिधान केलेला वैभव कमालीचा निराश दिसत आहे. सामना हरल्यानंतर तो मैदानावरच बसला आणि आपली टोपी काढून चेहरा लपवत रडू लागला. आपल्या संघाला विजय मिळवून देता न आल्याची खंत त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. याच दरम्यान क्रीडा संस्कृतीचे (Sportsmanship) एक उत्तम दर्शन घडले. कोलकाता नाईट रायडर्सचा एक खेळाडू धावत वैभवजवळ आला आणि त्याने त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याचे सांत्वन केले. हार-जीत हा खेळाचा भाग असल्याचे सांगत त्याने या युवा खेळाडूला धीर दिला.

शेवटच्या षटकात सामन्याचे चित्र पालटले
ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना 156 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात फलंदाजीला उतरलेल्या कोलकाताची सुरुवात अतिशय खराब झाली. संघाने अवघ्या 85 धावांवर आपल्या 6 विकेट्स गमावल्या होत्या. मात्र, त्यानंतर रिंकू सिंग आणि अनुकूल रॉय यांनी सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली आणि एक उत्कृष्ट भागीदारी रचून राजस्थानच्या तोंडचा घास हिरावून घेतला.

हेही वाचा - Rashid Khan: 'भारतात येऊन राहा, आम्ही सर्व कागदपत्रं देतो...'; BCCI च्या वरिष्ठ अधिकाऱ्याची ऑफर राशिद खानने नाकारली?

रिंकू सिंगचा 'फिनिशर' अवतार
या सामन्यात रिंकू सिंग पुन्हा एकदा आपल्या जुन्या लयीत परतलेला पाहायला मिळाला. त्याने नाबाद 53 धावांची धडाकेबाज खेळी केली, ज्यामध्ये 5 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. शेवटच्या षटकात कोलकाताला विजयासाठी 9 धावांची गरज होती. रिंकूने पहिल्या दोन चेंडूंवर सलग चौकार ठोकून सामन्यात बरोबरी साधली आणि चौथ्या चेंडूवर उत्तुंग षटकार मारून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. रिंकूच्या या वादळी खेळीमुळे वैभव सूर्यवंशी आणि राजस्थानच्या इतर खेळाडूंचा मोठा हिरमोड झाला.
 


सम्बन्धित सामग्री