IND vs WI: 2026 च्या T-20 विश्वचषकातील शेवटच्या सुपर 8 सामन्यापूर्वी क्रिकेटचा कलिंजर सुनील गावस्कर यांनी भारतीय संघाला धोक्याचा इशारा दिला आहे. वेस्ट इंडिजसारख्या बलाढ्य संघाला कमी लेखणे भारताला महागात पडू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. सेमीफायनलमधील स्थान अद्याप निश्चित नसल्याने, टीम इंडियाला आता कोणतीही चूक करणे परवडणारे नाही. विशेषतः अशा संघाविरुद्ध जो सध्या बॅट आणि बॉल दोन्हीमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे.
"वेस्ट इंडिजला हलक्यात घेऊ नका" - सुनील गावस्कर
स्टार स्पोर्ट्सच्या "क्रिकेट लाईव्ह" कार्यक्रमात बोलताना भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी या सामन्याचे गांभीर्य अधोरेखित केले. ते म्हणाले, "भारत वेस्ट इंडिजला मुळीच हलक्यात घेऊ शकत नाही. रविवारचा सामना हा निर्णायक असेल. हा सामना ठरवेल की भारत सेमीफायनलमध्ये धडक मारणार की त्यांना थेट 2028 च्या T-20 विश्वचषकाची वाट पाहावी लागणार." भारतासाठी हा 'करा किंवा मरा' असा प्रसंग असल्याचे त्यांनी सूचित केले आहे.
कॅरेबियन संघाचे 'वेगळे आव्हान' आणि आक्रमक पवित्रा
गावस्कर यांनी पुढे जोर दिला की, वेस्ट इंडिजचे आव्हान हे इतर संघांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. त्यांचे फलंदाज सध्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये असून गोलंदाजही अचूक टप्प्यावर मारा करत आहेत. वेस्ट इंडिजचा संघ विरोधी संघाच्या छोट्याशा चुकीचीही मोठी शिक्षा देण्यास सज्ज असतो. विशेषतः त्यांचे फलंदाज पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक फटकेबाजी सुरू करतात. चेंडूला आदर द्यायचा की नाही, याची ते वाट पाहत नाहीत; त्यांचा चेंडूला मान देण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तो सीमापेलेपार धाडणे, असे मार्मिक निरीक्षण गावस्कर यांनी नोंदवले.
हेही वाचा - IPL 2026: क्रिकेटप्रेमींसाठी मोठी अपडेट, BCCI बदलणार आयपीएलचा मुहूर्त; आता 'या' तारखेला होणार पहिला सामना
ईडन गार्डन्सवर रंगणार 'हाय व्होल्टेज' ड्रामा
वेस्ट इंडिजच्या या तोफखान्याचा सामना करण्यासाठी भारताला अत्यंत चतुर नियोजन करावे लागणार आहे. "भारताला हुशारीने खेळावे लागेल आणि वेस्ट इंडिजला अशा प्रकारे पराभूत करावे लागेल ज्याची त्यांना अपेक्षा नसेल," असे गावस्कर म्हणाले. दोन्ही संघ 1 मार्च 2026 रोजी कोलकात्यातील ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर आमनेसामने येतील. या हाय व्होल्टेज सामन्यातील विजेता संघ थेट उपांत्य फेरीत आपली जागा निश्चित करेल.