मध्यपूर्वेत वाढत्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर भारत आणि इस्रायल यांच्यातील राजनैतिक संपर्क अधिक सक्रिय झाल्याचे चित्र समोर आले आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत इस्रायलच्या बाजूने ठाम भूमिका घेतल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.मध्यपूर्वेतील अलीकडच्या घडामोडींमुळे प्रादेशिक तणाव वाढला आहे. विशेषतः इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या निधनानंतर परिस्थिती अधिक संवेदनशील बनली आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली. नेतन्याहू यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, भारताने इस्रायलसोबत मैत्रीपूर्ण आणि ठाम भूमिका घेतली असून त्याबद्दल त्यांनी मोदींचे आभार मानले. संभाषणाचा तपशील त्यांनी उघड केला नाही; मात्र भारतातील लोकांकडून इस्रायलला मिळणाऱ्या पाठिंब्याचेही त्यांनी कौतुक केले. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनीही मध्यपूर्वेतील परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन करत सर्व प्रकारच्या शत्रुत्वाला आळा बसावा, अशी भूमिका मांडली. संवाद आणि राजनैतिक मार्गाने तणाव कमी करण्याची गरज भारताने अधोरेखित केली आहे.
मध्यपूर्वेतील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मोदी विविध आखाती देशांच्या नेत्यांशी सातत्याने संपर्कात आहेत. त्यांनी सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स, बहरीनचे राजे तसेच संयुक्त अरब अमिरातीच्या नेतृत्वाशी चर्चा केली आहे. या संवादांमध्ये प्रादेशिक स्थैर्य, ऊर्जा सुरक्षितता आणि भारतीय नागरिकांच्या संरक्षणाचा मुद्दा केंद्रस्थानी राहिला.याचदरम्यान, परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची बैठक पार पडली. या बैठकीत संघर्षग्रस्त भागात असलेल्या भारतीयांच्या सुरक्षेवर विशेष भर देण्यात आला. आवश्यक असल्यास मदत आणि स्थलांतराची तयारी ठेवण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.