श्रीनगर: भारताच्या ऑपरेशन सिंदूर, हवाई हल्ले, क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे पाकिस्तान इतका घाबरला आहे की, तो एकापाठोपाठ एक पाऊल उचलत आहे. पाकिस्तानने आपले जनरल मुख्यालय रावळपिंडीहून इस्लामाबादला हलवण्याचा निर्णय घेतला आहे. नूर खान एअरबेसवर भारतीय क्षेपणास्त्र यशस्वीरित्या पोहोचल्यानंतर पाकिस्तानने मुख्यालय हलवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. भारताने केलेल्या अचूक क्षेपणास्त्र हल्ल्यात पाकिस्तानचा नूर खान हवाई तळ जवळजवळ उद्ध्वस्त झाला. या हल्ल्याने केवळ पाकिस्तानी हवाई दलालाच हादरवून सोडले नाही तर लष्कराच्या सर्वोच्च नेतृत्वालाही धोरणात्मक माघार घेण्यास भाग पाडले. आता बातमी अशी आहे की पाकिस्तानी सैन्य त्यांचे जनरल हेडक्वार्टर म्हणजेच GHQ रावळपिंडीहून इस्लामाबादला हलवणार आहे.
रावळपिंडीच्या चकलाला भागात असलेले जीएचक्यू हे पाकिस्तानी सैन्याच्या धोरणात्मक आणि प्रशासकीय कारवायांचे केंद्र आहे. ते लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांचे अधिकृत निवासस्थान देखील येथे आहे. परंतु भारतीय हल्ल्यांनंतर नूर खान एअरबेसचे ज्या प्रकारे नुकसान झाले त्यावरून हे स्पष्ट झाले की हा परिसर आता सुरक्षित राहिलेला नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, भारतीय सैन्याने हल्ला केला तेव्हा असीम मुनीरला एका बंकरमध्ये आश्रय घ्यावा लागला.
दरम्यान, नूर खान एअरबेस, ज्याला पूर्वी चकलाला एअरबेस म्हणून ओळखले जात असे, हा पाकिस्तानचा सर्वात संवेदनशील आणि महत्त्वाचा एअरबेस मानला जातो. व्हीआयपी हालचालींव्यतिरिक्त, हे विशेष ऑपरेशन्स आणि एअरलिफ्ट मोहिमांसाठी एक प्रमुख केंद्र आहे. परंतु, हा तळ भारतीय ब्राह्मोस क्षेपणास्त्रांच्या जलद आणि अचूक प्रहार क्षमतेला तोंड देऊ शकला नाही. ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानला लक्ष्य करून भारताने पाकिस्तानला स्पष्ट संदेश दिला आहे की सीमेपलीकडे बसण्याचे धाडस करणाऱ्यांना आता सुरक्षित आश्रय मिळणार नाही.
हेही वाचा - 'लोकांना नाश्ता करायला जितका वेळ लागतो, तितक्यात तुम्ही शत्रूंना संपवले...'; भूज एअरबेसवर राजनाथ सिंह यांच्याकडून सैनिकांचं कौतुक
तथापि, उपग्रह प्रतिमांचा हवाला देऊन, एअर मार्शल ए.के. भारतीने पुष्टी केली की केवळ नूर खान एअरबेसच नाही तर पाकिस्तानमधील इतर प्रमुख विमानतळ देखील भारताच्या प्रत्युत्तर कारवाईच्या कक्षेत आले. कराचीतील मालीर कॅन्टवरही सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला, ज्यासाठी भारतीय हवाई दलाने शत्रूच्या हद्दीत 150 किलोमीटर आत प्रवेश केला. याशिवाय रफीकी, मुरीद, सुक्कूर, सियालकोट, पसरूर, चुनियान, सरगोधा, स्कर्दू, भोलारी आणि जेकोबाबाद हे लष्करी तळही भारतीय हल्ल्यांचे लक्ष्य बनले.
हेही वाचा - मी मध्यस्थी केली असं म्हणणार नाही; मध्यस्थीच्या वक्तव्यावरून ट्रम्प यांचा यु-टर्न
पाकिस्तानच्या GHQ इस्लामाबादला हलवण्याच्या योजनेवरून असे दिसून येते की, तेथील लष्कर आता त्यांच्या पारंपारिक लष्करी गडाला असुरक्षित मानू लागले आहे. रावळपिंडी हे बऱ्याच काळापासून पाकिस्तानच्या लष्करी सामर्थ्याचे प्रतीक आहे, परंतु भारताच्या कृतीने त्या आत्मविश्वासाचा पाया हादरवून टाकला आहे.