Shehbaz Sharif Claim Fact Check: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताबाबत सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवण्याचा प्रयत्न केल्यानंतर एक्स (ट्विटर) ने त्यांचा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे. शाहबाज यांनी जम्मू-काश्मीरबाबत चुकीचे दावे करत भारतावर आक्रमणाचा आरोप केला होता, परंतु एक्सच्या कम्युनिटी नोट्सने वस्तुस्थिती सांगत त्यांचा खोटेपणा उघड केला. शाहबाज शरीफ यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर लिहिले होते की, '27 ऑक्टोबर हा काश्मीरच्या इतिहासातील काळा दिवस आहे. या दिवशी भारतीय सैन्याने जबरदस्तीने श्रीनगरमध्ये प्रवेश केला आणि प्रदेश ताब्यात घेतला.' त्यांनी पुढे म्हटले की, 'गेल्या आठ दशकांपासून भारताच्या ताब्यात असलेल्या जम्मू-काश्मीरमधील लोकांना अत्याचारांना सामोरे जावे लागत आहे.'
एक्सकडून पोलखोल
तथापि, एक्सने त्यांच्या या पोस्टला ‘दिशाभूल करणारी माहिती’ असे संबोधून वस्तुस्थिती स्पष्ट केली. कम्युनिटी नोट्समध्ये नमूद करण्यात आले की, 'महाराजा हरि सिंह यांनी 26 ऑक्टोबर 1947 रोजी भारतात विलिनीकरणाचा करार केला होता. त्या करारानंतरच भारतीय सैन्य 27 ऑक्टोबर रोजी जम्मू-काश्मीरच्या संरक्षणासाठी तिथे पोहोचले.'
हेही वाचा - Turkey Earthquake: पश्चिम तुर्कीला भूकंपाचा जोरदार धक्का; इमारती कोसळल्या, नागरिक झाले भयभीत
या नोट्समध्ये महाराजा हरि सिंह यांनी स्वाक्षरी केलेल्या अधिकृत दस्तऐवजाचा संदर्भ दिला गेला आहे, ज्यावरून हे स्पष्ट होते की, भारताने कधीही जबरदस्तीने जम्मू-काश्मीरवर कब्जा केला नाही, तर त्या राज्याने स्वतःहून भारतात विलीन होण्याचा निर्णय घेतला होता.
काय आहे यामागील खरा इतिहास?
फाळणीच्या काळात जम्मू-काश्मीर हे महाराजा हरि सिंह यांचे स्वतंत्र राज्य होते. सुरुवातीला त्यांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पाकिस्तानकडून पाठवण्यात आलेल्या सैनिकांनी राज्यावर हल्ला केला आणि उरी-बारामुल्ला ताब्यात घेतले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने हरि सिंह यांनी भारताकडे मदतीची विनंती केली. त्यानंतर विलिनीकरणाचा करार झाला आणि भारतीय सैन्याने 27 ऑक्टोबरला श्रीनगरमध्ये प्रवेश करून पाकिस्तानी आक्रमण परतवले. ही ऐतिहासिक पार्श्वभूमी स्पष्ट करत एक्सने शाहबाज शरीफ यांच्या पोस्टला ‘भ्रामक माहिती’ असा शिक्का मारला आहे. त्यामुळे पाकिस्तानचा काश्मीरविषयीचा खोटा प्रचार पुन्हा एकदा उघड झाला आहे.