US Singer Mary Millben Jabs Rahul Gandhi : अमेरिकेची गायिका आणि सांस्कृतिक राजदूत मेरी मिलबेन यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर त्यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत केलेल्या विधानांवरून जोरदार टीका केली आहे. मिलबेन यांनी राहुल गांधींना ‘तुमच्या "I hate India" (मला भारताचा तिरस्कार आहे दौऱ्यांवर किंवा भारतद्वेषी दौऱ्यांवर) परत जाण्यास सांगितले आहे. मिलबेन या नेहमीच पंतप्रधान मोदींचे कौतुक करताना दिसतात.
मिलबेन यांचे हे वक्तव्य राहुल गांधींनी X (पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट केल्यानंतर आले आहे. त्या पोस्टमध्ये राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी हे 'डोनाल्ड ट्रम्प यांना घाबरतात' असे म्हटले होते. राहुल गांधींनी असा आरोप केला होता की, पंतप्रधान मोदी डोनाल्ड ट्रम्प यांना भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, असा निर्णय घेण्याची आणि जाहीर करण्यासाठी दबाव आणतात. ट्रम्प यांनी वारंवार अपमान करूनही त्यांना अभिनंदनाचे संदेश पाठवत राहतात आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ बाबत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी असलेले ‘मतभेद दर्शवत नाहीत’.
यावर अमेरिकन गायिका मिलबेनने म्हटले, "तुम्ही चुकीचे आहात, @RahulGandhi. पंतप्रधान @narendramodi हे अध्यक्ष ट्रम्प यांना घाबरत नाहीत. पंतप्रधान मोदींना दीर्घकालीन रणनीती समजते आणि अमेरिकेसोबतचे त्यांचे राजकारण (Diplomacy) धोरणात्मक आहे. ज्याप्रमाणे @POTUS नेहमी अमेरिकेचे हित प्रथम ठेवतील, त्याचप्रमाणे पंतप्रधान मोदीही भारतासाठी सर्वोत्तम काय आहे, तेच करतील. आणि मी त्याचे कौतुक करते. देशाचे प्रमुख असेच वागतात," असे मेरी मिलबेन यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा - Rishi Sunak : 'संरक्षणवादी जगात भारताने दाखवली सकारात्मक दिशा'; ऋषी सुनक यांचे भारताच्या धोरणाचे कौतुक
मिलबेन यांनी ठामपणे सांगितले की, पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प दोघेही "आपल्या देशासाठी काय सर्वोत्तम आहे, तेच बोलतात आणि करतात"—आणि ही गोष्ट राहुल गांधींना समजेल, अशी त्यांना अपेक्षा नाही. मिलबेन पुढे म्हणाल्या, “तुमच्याकडे भारताचे पंतप्रधान बनण्याची क्षमता (acumen) नाही. त्यामुळे तुमच्याकडून या प्रकारच्या नेतृत्वाची अपेक्षा नाही. तुम्ही तुमच्या ‘मला भारताचा तिरस्कार आहे’ या दौऱ्यावर परत जाणे सर्वोत्तम ठरेल, जिथे तुम्ही एकटेच प्रेक्षक असाल – तुम्ही स्वतः.”
ट्रम्प यांचा रशियन तेलाचा दावा आणि भारताचे उत्तर
या आठवड्याच्या सुरुवातीला डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला होता की, पंतप्रधान मोदींनी त्यांना आश्वासन दिले आहे की, भारत रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवेल. ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ (कर) लावण्याचे कारणही हेच असल्याचे सांगितले होते. यावर भारताने अद्याप असे कोणतेही आश्वासन दिल्याबाबत काहीही म्हटलेले नाही.
या दाव्याला उत्तर देताना, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे (MEA) अधिकृत प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, ‘अस्थिर ऊर्जा परिस्थितीत भारतीय ग्राहकांचे हित जपण्यास’ भारताचे नेहमीच प्राधान्य राहिले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, “भारत तेल आणि वायूचा एक मोठा आयातदार आहे. स्थिर ऊर्जेच्या किंमती आणि सुरक्षित पुरवठा सुनिश्चित करणे, हे आमच्या ऊर्जा धोरणाचे दुहेरी ध्येय राहिले आहे. यासाठी ऊर्जेचे स्रोत व्यापक करणे आणि बाजाराच्या परिस्थितीनुसार विविधता आणणे यांचा समावेश आहे.” जयस्वाल पुढे म्हणाले, "आम्ही अनेक वर्षांपासून आमची ऊर्जा खरेदी वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि मागील दशकात यात सातत्याने प्रगती झाली आहे."
हेही वाचा - India China Relations: चीनचा भारतावर थेट हल्ला, WTOमध्ये दाखल केली तक्रार, इलेक्ट्रिक वाहन धोरणावरून वाद पेटला