काल 14 नोव्हेंबर म्हणजेच बालदिन होता. बालदिनाच्या दिवशीच वसईमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. शाळेत शिक्षिकेने दिलेल्या शिक्षेमुळे विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. शाळेत पोहचायला उशिर झाला त्यामुळे शिक्षिकेने विद्यार्थिनीला उठाबशा काढायला सांगितल्या. वसईमध्येही भयंकर घटना घडली असून या प्रकरणी कारवाई करण्यात यावी अशी मागणी पालकांनी केली. वसईमधील एका 13 वर्षीय मुलीला ती शाळेत उशिराने आल्यामुळे तिला उठाबशा काढण्याची शिक्षा दिली होती.
ही शिक्षा त्या मुलीच्या जीवावर बेतली. वसई पश्चिममधील सातीवली परिसरातल्या श्री हनुमंत विद्या हायस्कूलमध्ये सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या काजल गौंड या मुलीला शाळेत येण्यास दहा मिनिटे उशीर झाला. याच कारणाने तिच्या वर्गातील महिला शिक्षिकेने तिला आणि तिच्यासोबत उशिराने आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर उभ राहून 100 उठाबशा काढण्याची शिक्षा केली. यामुळे सर्व विद्यार्थी उठाबशा काढू लागले. काही विद्यार्थी मध्येच थांबले मात्र शिक्षिकेच्या ओरड्याला घाबरलेल्या काजलने पुर्ण 100 उठाबशा काढल्या.
100 उठाबशा काढत असताना काजलच्या पाठीमागे वेदना व्हायला लागल्या ज्याचा त्रास तिला असहाय्य होऊ लागला. यामुळे तिची प्रकृती बिघली आणि नालासोपाराच्या रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र तरी देखील तिच्या प्रकृतीत काही बदल दिसले नाही. उलट तिची परिस्थिती चिंताजनक झाल्यामुळे तिला मुंबईच्या जेजे रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र या लहान मुलीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकारामुळे पालकांकडूनही तीव्र संताप व्यक्त केला जात आहे व कठोर शिक्षेची मागणी केली जात आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहेच, त्याशिवाय संबंधित शिक्षिकेवर कारवाईची मागणीही जोर धरत आहे.