Tuesday, March 17, 2026 02:23:48 PM

Crime News : फूस लावून तलावाजवळ नेलं, डोक्यात मागून वार, मित्रांनीच मित्राचा काटा काढला; पोस्टमार्टममुळे बिंग फुटलं

भांडुपच्या तुळशेत पाडा परिसरात राहणाऱ्या सिद्धार्थ लोंढे या विद्यार्थ्याला त्याच्याच तीन अल्पवयीन मित्रांनी संपवल्याचं समोर आलं आहे.

crime news  फूस लावून तलावाजवळ नेलं डोक्यात मागून वार मित्रांनीच मित्राचा काटा काढला पोस्टमार्टममुळे बिंग फुटलं

Crime News :  खेळायला जातो म्हणून घराबाहेर पडलेल्या एका 14 वर्षीय मुलाचा शेवट इतका भीषण होईल, याची कल्पनाही त्याच्या पालकांनी केली नव्हती. भांडुपच्या तुळशेत पाडा परिसरात राहणाऱ्या सिद्धार्थ लोंढे या विद्यार्थ्याला त्याच्याच तीन अल्पवयीन मित्रांनी संपवल्याचं समोर आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे, सुरुवातीला हा अपघात वाटत असला तरी शवविच्छेदन (Post-mortem) अहवालाने या प्रकरणातील काळं कृत्य उघडकीस आणलं.

नेमकी घटना काय?
सिद्धार्थ 22 फेब्रुवारीला दुपारी 3 च्या सुमारास मित्रांसोबत खेळण्यासाठी बाहेर पडला. मात्र, रात्री उशिरापर्यंत तो घरी न परतल्याने घाबरलेल्या पालकांनी भांडुप पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून शोध सुरू केला असता, 23 फेब्रुवारीला मुलुंडच्या विहार तलावाकाठी सिद्धार्थचा मृतदेह आढळून आला.

अपघात की घातपात? 'पोस्टमॉर्टम'ने उघडले गुपित
सुरुवातीला सिद्धार्थचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. परंतु, शवविच्छेदन अहवालाने तपासाला वेगळीच कलाटणी दिली. सिद्धार्थच्या फुफ्फुसात आणि पोटात अजिबात पाणी नव्हते, म्हणजेच त्याचा मृत्यू बुडून झालेला नव्हता. त्याच्या डोक्याच्या मागील बाजूस गंभीर जखम आणि अंतर्गत रक्तस्राव झाल्याचे स्पष्ट झाले. यावरून पोलिसांनी हत्येचा संशय बळकट केला आणि त्याच्यासोबत खेळायला गेलेल्या मित्रांची चौकशी सुरू केली.

हेही वाचा - Pune : अचानक मोठा आवाज आला अन् रक्ताच्या थारोळ्यात दिसली तरुणी; पुण्यात धक्कादायक प्रकार

काठीने वार करून पाण्यात फेकलं
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तिन्ही अल्पवयीन मित्रांनी (वय 14 ते 15 वर्षे) सुरुवातीला पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींच्या म्हणण्यानुसार, "सिद्धार्थ आमच्यावर सतत दादागिरी करायचा. त्याला धडा शिकवण्यासाठी आम्ही त्याला तलावाजवळ नेले. तिथे त्याच्या डोक्यावर काठीने जोरदार प्रहार केला. तो बेशुद्ध पडल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याला पाण्यात फेकून दिले."

आरोपींची बालसुधारगृहात रवानगी
भयंकर संताप आणि सूडबुद्धीतून मुलांनी उचललेल्या या पावलामुळे संपूर्ण मुंबई हादरली आहे. भांडुप पोलिसांनी या तिन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी बालसुधारगृहात केली आहे.


सम्बन्धित सामग्री