मुंबई : मुंबईतील पायधूनी परिसरात रात्री जेवणानंतर कलिंगड खाल्ल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेनंतर कलिंगडाविषयी विविध शंका-कुशंका समोर येऊ लागल्या. विशेष म्हणजे या कुटुंबाने रात्री बिर्याणी खाल्ल्याने मध्यरात्री उशीरा कलिंगड खाल्ले होते. त्यामुळे नेमकी विषबाधा कशामुळे झाली यावर तर्कवितर्क लावले जात होते. अन्न विषबाधा झाल्याने चौघांचा मृत्यू झाल्याचं सुरुवातीला सांगितलं जात होतं. मात्र आता या प्रकरणात वेगवेगळे खुलासे समोर येत आहेत. पोलीस तपासानुसार तसेच वैद्यकीय अहवालात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या चार जणांचा मृत्यू अन्नातून झालेल्या विषबाधेमुळे नाही, तर थेट त्यांना विष देऊन मारलं असावं, अशी शक्यता आता वर्तवली जात आहे.
हेही वाचा : Bullock Cart Race Tragedy: आयोजकांचा हलगर्जीपणा जिवावर बेतला! ना रुग्णवाहिका ना पोलीस बंदोबस्त; अनियंत्रित बैलाच्या धडकेत 35 वर्षीय तरुणाचा करुण अंत
फॉरेन्सिक अहवालानुसार पीडितांपैकी एकाच्या शरीराच्या तपासणीत मॉर्फिनचे अंश आढळले आहेत. सामान्यतः कलिंगड किंवा कोणत्याही फळाच्या अन्नातून होणाऱ्या विषबाधेमध्ये अशा प्रकारचे घातक अमली पदार्थ किंवा घटक आढळत नाहीत. तसेच अन्न आणि औषध प्रशासनाच्या अहवालानुसार कलिंगडमध्ये कोणतीही भेसळ झाल्याने निष्पन्न झाले नाही. त्यात कोणताही रंग किंवा रासायनिक पदार्थदेखील आढळून आलेला नाही. एफडीएच्या प्राथमिक अहवालानुसार, या प्रकरणात फूड पॉयझनिंग होण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचे सूत्रांनी सांगितलं आहे. कलिंगड नैसर्गिकरित्या इतके विषारी होऊ शकत नाही की, ज्यामुळे चार जणांचा बळी जाईल. दरम्यान, फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या (FSL) सविस्तर अहवालाची अद्याप प्रतीक्षा आहे. हा अहवाल आल्यानंतरच विष नेमके कोणत्या स्वरूपाचे होते आणि ते शरीरात कसे पोहोचले? याचं चित्र स्पष्ट होईल. त्यामुळे हा अपघात नसून घातपात तर नाही ना, या दिशेने आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
दरम्यान, या कुटुंबातील इसम अब्दुल्ला डोकाडिया हे एका प्रकरणामध्ये साक्षीदार असल्याची माहिती समोर येत आहे. 2019 साली डी एन नगर पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद झाली होती. जोगेश्वरीतील एका विकासकला एका महिलेनं पैसे दिले होते. विकासकाने पैसे घेण्यास अब्दुल्ला यांना पाठवलं होतं, नंतर ते पैसे विकासाकाने परत दिले नाही. महिलेनं 2019 साली या प्रकरणी डी एन नगर पोलीस स्टेशनला फसवणुकीची तक्रार दाखल केली. या प्रकरणात अब्दुल्ला हे साक्षीदार होते. त्यांची साक्ष महत्वाची ठरणार होती. 2026 साली या प्रकरणाची सुनावणी होणार होती. पण, सुनावणीआधीच डोकाडिया यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या दृष्टीकोनातूनही पोलीस तपास करणार ही नाही, हे पहावे लागणार आहे.