अजय घोडके, प्रतिनिधी, लातूर: लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील जळकोट रोडवरील राजीव गांधी तंत्रनिकेतन महाविद्यालयात 70 विद्यार्थ्यांचे बनावट प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी मोठा घोटाळा समोर आला आहे. ही फसवणूक सन 2013-14 आणि 2014-15 या कालावधीत घडली असून, शासनाला तब्बल 14 लाख 40 हजार 440 रुपयांची हानी झाली आहे.
गुनाई शिक्षण प्रसारक मंडळाच्या उदगीर येथील महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आणि संस्थाचालक बापूराव राठोड यांच्यावर उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही फसवणूक प्रकरण उदगीरच्या शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात धक्कादायक ठरली आहे.
हेही वाचा: Eknath Shinde On Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबद्दल एकनाथ शिंदेंनी केला मोठा खुलासा, काय म्हणाले?
तपासात समोर आले आहे की, वरील महाविद्यालयात शिकणाऱ्या 70 विद्यार्थ्यांचे बनावट जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिनलरी प्रमाणपत्र बनवून शासनाला सादर केले गेले. या प्रमाणपत्रांवर बनावट शिक्के लावून ती खरी असल्याचे दाखवण्यात आले. या कृत्यामुळे शासनाची मोठी आर्थिक हानी झाली आहे.
उदगीर तहसीलचे नायब तहसीलदार विलास सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी बापूराव राठोड यांच्यावर कलम 420, 464, 467, 468, 471 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. सध्या बापूराव राठोड फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
बापूराव राठोड हे उदगीर तालुक्यातील कौळखेड येथील गुणाई शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थाचालक आहेत. तसेच, उदगीर शहरातील जळकोट रोड परिसरातील राजीव गांधी तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आहेत. शिवाय ते लातूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत.
मागील दोन महिन्यांपूर्वी त्यांची ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली होती. या घोटाळ्यामुळे आता त्यांचा शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिष्ठा धोक्यात आली आहे. स्थानिक नागरिक आणि पालक या प्रकरणामुळे चिंतेत आहेत.
हेही वाचा: Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात पावसाचा कहर! 'या' 5 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी; पुढील 3 दिवस अत्यंत महत्त्वाचे
उदगीर पोलीस प्रशासन या प्रकरणी त्वरित कारवाई करत असून, फरार आरोपींचा शोध घेत आहे. पोलिसांनी आरोपी शोधून त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे.
या प्रकरणामुळे राज्यातील शैक्षणिक संस्था आणि विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रांच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाने अशा प्रकारच्या घोटाळ्यांवर कडक कारवाई करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.