मुंबई: बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते आणि माजी खासदार गोविंदा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अलीकडील मुलाखतीत त्यांनी केवळ फिल्म इंडस्ट्रीतील आरोपांवरच नाही तर राजकारणातून बाहेर पडण्यामागचं खरं कारणही स्पष्ट केलं. “मी माझ्या कुटुंबासाठी राजकारण सोडलं. राजकीय आयुष्यामुळे माझ्या मुलांवर वाईट परिणाम व्हावा असं मला कधीच वाटलं नाही,” असं ते म्हणाले.
गोविंदा यांनी सांगितलं की राजकारणात सक्रिय असताना त्यांना कुटुंबासाठी वेळ देता येत नव्हता. सततचा सार्वजनिक दबाव, टीका-टिप्पणी आणि वाद यांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कुटुंबाला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला. “राजकीय क्षेत्राने माझ्या कौटुंबिक आयुष्याला बाधा आणू नये, म्हणून मी तो निर्णय घेतला,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा: Canada School Shooting: कॅनडा हादरलं! शाळेत अंदाधुंद गोळीबार, 10 जणांचा मृत्यू तर 25 जखमी; हल्लेखोरानेही संपवलं जीवन
मुलगा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चांवरही गोविंदा यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितलं की त्यांना मुलाला चित्रपटसृष्टीचे विविध पैलू शिकता यावेत यासाठी निर्माता साजिद नाडियावाला यांच्याशी बोलून त्याला प्रॉडक्शन हाऊसमध्ये संधी उपलब्ध करून दिली. “मी कुटुंबासाठीच राजकारण सोडलं आणि मुलांच्या भविष्यासाठी जे शक्य आहे ते करत आहे,” असं ते म्हणाले.
दरम्यान, पत्नी सुनिता अहुजा यांनी गोविंदा यांच्यावर वेगवेगळे आरोप केले होते. त्यावर थेट प्रतिक्रिया देण्याऐवजी गोविंदा यांनी वैयक्तिक आरोपांवर भाष्य करणं टाळलं. “या विषयावर अधिक बोलणं मला योग्य वाटत नाही,” असं ते म्हणाले.
चित्रपटांच्या बाबतीत ‘फक्त हिरोची भूमिका करतो’ या आरोपांवरही गोविंदा यांनी प्रत्युत्तर दिलं. मात्र सध्या या वक्तव्यांमध्ये एक गोष्ट ठळकपणे समोर आली आहे राजकारणापेक्षा कुटुंब आणि मुलांचं भविष्य त्यांचासाठी अधिक महत्त्वाचं आहे. आता गोविंदा यांचा पुढचा प्रोजेक्ट कधी जाहीर होतो, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा: BJP Strict Action: आधी पक्षाला नडला, आता पक्षाबाहेर काढला; शिस्त मोडणाऱ्या भाजपच्या 69 शिलेदारांवर पक्षाचा 'सर्जिकल स्ट्राईक'